दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 14:11 IST2026-04-24T14:10:57+5:302026-04-24T14:11:50+5:30

ठाण्यातील सॅटिस पुलावर पुणे-वसई शिवशाही बसने घेतला पेट; क्षणात होत्याचे नव्हते, १४ प्रवासी सुखरूप

Massive Fire Guts Shivshahi Bus on Thane SATIS Bridge; Wedding Finery and Cash Worth Thousands Reduced to Ashes | दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब

दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब

लोकमत न्यूज नेटवर्क 
ठाणे: ठाण्यातील सॅटिस पुलावर गुरुवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास स्वारगेट (पुणे) ते वसई या शिवशाही बसला आग लागली. यात अनेक प्रवाशांनी सोबत आणलेले साहित्य खाक झाले. त्यामुळे क्षणात होत्याचे नव्हते झाले. वसईला लग्नासाठी निघालेल्या अलका काळडोके यांच्या लग्नासाठी खरेदी केलेल्या ३० साड्या,  ६० हजार रुपयांची रोकड काही सेकंदात डोळ्यांसमोर जळून खाक झाली आणि  साडेचार तोळ्यांचे सोन्याचे दागिने सापडले नाहीत. काळडोके यांच्यावर  लग्नसोहळ्याची जबाबदारी होती. दाेन दिवसांवर आलेल्या लग्नसोहळ्यासाठी आता काय घेऊन जाणार, असा प्रश्न त्यांच्यासमोर होता.

या बसमध्ये चिंचवड येथून सकाळी ९ वाजता अलका काळडोके आणि त्यांचे पती सदानंद वसईला विवाह सोहळ्यासाठी निघाले होते. २५ आणि २६ एप्रिल राेजी घरात लग्न असल्याने सर्व कुटुंबीय आनंदात होते. काही वेळात ठाण्याहून वसईला पोहचू या विचारात असताना बसने अचानक पेट घेतला. बसला आग लागल्याचे समजताच  बसचालक, वाहकाने प्रसंगावधान राखत बसमधील १४ प्रवाशांना तातडीने बाहेर काढले. दरम्यान, आगीने रौद्र रूप धारण केल्याने प्रवाशांच्या बॅगा जळून खाक झाल्या.

सर्व प्रवाशांसोबत काळडोके याही जीव वाचविण्यासाठी तत्काळ बसमधून खाली उतरल्या. त्यांच्या समोर आग आणि धूरच धूर दिसत होता. या सर्व गोंधळात कुणालही बसमधील सामान सोबत घेताच आले नाही. आग आटोक्यात आणल्यावर सामानाची, बॅगची शोधाशोध केली. जळालेल्या साडीचा अर्धाच तुकडा हाती लागले,’ असे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले.

Web Title: Massive Fire Guts Shivshahi Bus on Thane SATIS Bridge; Wedding Finery and Cash Worth Thousands Reduced to Ashes