भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 15:35 IST2026-04-24T15:32:56+5:302026-04-24T15:35:52+5:30
या समुदायाला सीमावर्ती भागात वसवून इस्रायलला आपल्या लोकसंख्येचे संतुलनही राखायचे आहे

भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
नवी दिल्ली - इस्रायल सध्या भारतात एक खास ऑपरेशन राबवत आहे. या मोहिमेअंतर्गत मणिपूरमधील सुमारे ५,००० लोकांना इस्रायलच्या तेल अवीव शहरात स्थायिक करण्याची तयारी केली जात आहे. विशेष म्हणजे हे सर्व लोक 'बनेई मेनाशे' या एकाच समाजाचे आहेत. गुरुवारी इस्रायल सरकारने सुमारे २५० लोकांच्या पहिल्या तुकडीला दिल्लीमार्गे तेल अवीव येथे पोहोचवले, ज्यामुळे या मोहिमेबद्दल सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.
इस्रायलनं या मिशनला 'ऑपरेशन विंग्स ऑफ डॉन' असं नाव दिले आहे. मागील वर्षी बेंजामिन नेतन्याहू सरकारने भारतातील या समुदायाच्या ४६०० लोकांच्या इमिग्रेशनसाठी फंड देण्याची घोषणा केली होती. गेल्या २ दशकात ५ हजार लोक आधीच इस्रायला गेले आहेत. इस्रायलमध्ये या समुदायाला स्थायिक करण्याची सुरूवात आहे. दरवर्षी १२०० लोकांना त्यासाठी इस्रायलला नेले जातात असं इस्रायलचे मंत्री ओफिर सोफर यांनी म्हटलं आहे.
🇮🇱 Israel is Importing People from India to Raise Their Numbers
— Ryan Rozbiani (@RyanRozbiani) April 24, 2026
Real reason, they need cheap labor and want to use these people.
A plane with 240 new immigrants from the Menashe tribe landed tonight at Ben Gurion Airport.
In November 2025, Israel's government approved a plan… pic.twitter.com/Co5GUx7E5J
बनेई मेनाशे समुदाय कोण आहे?
बायबलमध्ये उल्लेखलेल्या प्राचीन इस्रायलच्या १२ जमातींपैकी एक अशी बनेई मेनाशे जमात मानली जाते. ते स्वतःला बायबलमधील हरवलेल्या जमातींपैकी एक मानतात. हा समुदाय आपली मुळे योसेफचा मुलगा मेनाशे याच्यापर्यंत शोधतो. ऐतिहासिकदृष्ट्या इ.स.पूर्व ७२२ मध्ये अस्सीरियन शासकांनी या जमातीला हद्दपार केले होते. त्यानंतर शतकानुशतके सुमारे १०,००० लोकांनी पर्शिया, अफगाणिस्तान, तिबेट आणि चीनमधून प्रवास करत ईशान्य भारतात पोहोचून मणिपूर आणि मिझोराममध्ये वस्ती केली.
भारतातील कुकी जमात
हा समुदाय भारतातील कुकी जमातीचा एक भाग आहे. जरी बहुतेक कुकींनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला असला तरी बनेई मेनाशे समुदाय ज्यू धर्म आणि परंपरांचे पालन करतो. भारतात ज्यूंना नेहमीच एक सुरक्षित वातावरण लाभले आहे, ज्यामुळे ते धार्मिक छळाशिवाय जगू शकले. या लोकांना इस्रायलला नेण्यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे या समुदायाचा धर्म आहे. मणिपूरच्या दुर्गम डोंगराळ भागात धार्मिक सुविधांच्या कमतरतेमुळे या लोकांना त्यांची परंपरा पूर्णपणे करता येत नाही. काही धार्मिक विधींसाठी कमीत कमी १० लोकांचा समुह असणे गरजेचे असते जे तिथे मिळणे कठीण आहे. त्याशिवाय पारंपारिक भोजन आणि सांस्कृतिक संसाधनाची कमी हीदेखील समस्या आहे. इस्रायलला जाण्याच्या तयारीने अनेक लोक हिब्रू भाषा शिकत आहेत. इस्रायलला पोहचल्यानंतर त्यांना नागरिकत्व मिळवण्यासाठी औपचारिकपणे यहुदी धर्म स्वीकारावा लागेल.
दरम्यान, या समुदायाला इथं वसवल्याने देशाचा उत्तर आणि गॅलिली प्रदेश मजबूत होईल असं इस्रायली सरकारचे म्हणणे आहे. या निर्णयामागे आर्थिक आणि सामरिक कारणेही पाहिली जात आहेत. इस्रायल बऱ्याच काळापासून गाझा आणि इराणसोबत युद्ध लढत आहे, ज्यामुळे तिथे कामगारांची कमतरता आहे. युद्धामुळे नेपाळ आणि थायलंडसारख्या देशांमधून येणाऱ्या कामगारांची संख्याही कमी झाली आहे. अशा परिस्थितीत बनेई मेनाशे समुदायाला तिथे वसवल्याने तेथील कामगारांची कमतरता भरून काढता येऊ शकते. याशिवाय या समुदायाला सीमावर्ती भागात वसवून इस्रायलला आपल्या लोकसंख्येचे संतुलनही राखायचे आहे. २०२३ मध्ये झालेल्या इस्रायल-हमास युद्धात या समुदायातील २०० हून अधिक लोकांनी इस्रायली सैन्यासोबत उतरून लढा दिला होता.