उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 16:50 IST2026-04-24T16:49:16+5:302026-04-24T16:50:32+5:30
Uddhav Thackeray Vidhan Parishad: विधान परिषदेच्या जागेसाठी मविआमध्ये रस्सीखेच सुरु असल्याचाही केला दावा

उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
Uddhav Thackeray Vidhan Parishad: विधान परिषदेच्या जागेसाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच आणि एकमेकांचे पाय ओढण्याचे काम सुरु आहे. विधान परिषदेची जागा उबाठाला हवी असेल तर राज्यसभेची जागा काँग्रेसला द्यावी लागेल, असा आग्रह काँग्रेसने धरला आहे. आता उद्धव ठाकरे विधान परिषदेवर गेले तर वर्षभरानंतर राज्यसभा निवडणुकीत आपला पत्ता कट होऊ शकतो म्हणून आपल्या खासदारकीची चिंता लागलेले संजय राऊत हे उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाऊ नयेत यासाठी प्रयत्नशील आहेत," असा खळबळजनक आरोप भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शुक्रवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
"माझी मागणी आहे की संजय राऊत यांना काँग्रेसरत्न पुरस्कार देण्यात यावा. कारण राहुल गांधीही काँग्रेसची बाजू मांडत नाहीत, त्यापेक्षा जास्त चांगली बाजू संजय राऊत मांडतात. काँग्रेसची गुलामी करण्याचे काम संजय राऊत यांच्याकडून केले जातेय. मीठ उद्धव ठाकरे यांचे खायचे आणि चाकरी काँग्रेसची करायची हा संजय राऊत यांचा धंदा झाला आहे. संजय राऊत यांचे प्रगल्भ नेतृत्व मिळाल्यामुळे बुडणाऱ्या काँग्रेसला थोडे अच्छे दिन येतील," अशी टीका बन यांनी केली.
"नारी शक्ती वंदन विधेयकाच्या माध्यमातून महिलांना संसदेत ३३ टक्के आरक्षण मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयत्न केले. परंतु दुर्दैवाने उबाठा गट, काँग्रेसने त्याला विरोध केला. महाराष्ट्राची महिला मुख्यमंत्री का झाली नाही? देशात भाजपाने महिला पंतप्रधान का केले नाही हे विचारण्याआधी संजय राऊत यांना मला विचारायचे आहे की २०१९ साली उद्धव ठाकरे यांच्या ऐवजी रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्री का केले नाही? संजय राऊत, तुम्हाला एवढी चिंता असेल तर पक्षप्रमुख म्हणून आदित्य ठाकरे यांचे नाव घोषित न करता रश्मी ठाकरे यांचे नाव तुम्ही घोषित करणार आहात का? त्यासाठी आग्रह धरणार आहात का?" अशा प्रश्नांची सरबत्ती बन यांनी केली.
"तुम्ही सातत्याने महिलांचा अपमान करण्याचे काम केले. भाजपा महिलांचा सन्मान करते. काल स्वप्ना पाटकर यांनी एक ट्विट केले ते संजय राऊत तुम्ही ध्यानात घ्या. तुमच्या कच्च्याबच्च्यांकडून, तुमच्या टोळीकडून ताईंना धमकावण्याचा प्रयत्न होतो आहे. त्या पुस्तक लिहित असल्याने त्यांना धमकी देऊन ते पुस्तक समोर येऊ नये यासाठी प्रयत्न करत आहात. मी कालच पाटकर यांच्याशी बोललो. महाराष्ट्रात देवेंद्रजींच्या सरकारमध्ये कुठल्याही बहिणीला त्रास होणार नाही. धमक्यांना भीक घातली जाणार नाही, हे लक्षात ठेवा," असेही बन म्हणाले.