“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 17:45 IST2026-04-24T17:38:37+5:302026-04-24T17:45:16+5:30
Minister Pratap Sarnaik News: रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्यावरून शिंदेसेनेत दोन गट पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असल्याचे म्हटले जात आहे.

“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Minister Pratap Sarnaik News: शिवसेनेत एकच गट आहे आणि त्या गटाचे नाव एकनाथ शिंदे आहे. एकनाथ शिंदे यांच्याच माध्यमातून आम्ही मार्गक्रमण करत आहोत. संजय निरुपम यांचा मला फोन आला होता. यासंदर्भात त्यांनी मला माहिती विचारली आणि पत्रही दिले. संजय निरुपम यांच्या मागणीवरून २९ एप्रिल रोजी मंत्रालयात बैठकीचे आयोजन केले आहे, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली.
रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्यावरून विशेषतः मुंबईत दोन गट पडलेले पाहायला मिळत आहेत. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाला मनसेचा पाठिंबा असून, शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी मराठी सक्तीवर आक्षेप घेतला आहे. मराठी अनिवार्य करण्याच्या मुद्द्यावरून शिंदेसेनेतच दोन गट पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. पत्रकारांशी बोलताना प्रताप सरनाईक यांनी सदर दावे फेटाळून लावतानाच मराठीत संवाद साधलाच पाहिजे, असेही ठामपणे सांगितले.
पत्रकारांशी बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले की, काही लोकांनी सर्वसामान्य रिक्षावाल्यांना भडकवण्याचे काम केले. त्यांना असे सांगितले की, तुमचे लायसन्स रद्द होईल, तुमचे परमिट रद्द होईल. माझे म्हणणे हेच आहे की, १९८९ मधील हा कायदा आहे. २०१९ मध्ये आम्ही त्यात सुधारणा केली. त्यात आता आणखी सुधारणा करून ओला-उबेर, रॅपिडो, टू व्हिलर जे प्रवासी आहेत, त्या एग्रिगेटर पॉलिसीत या कायद्याची आणि मराठी भाषेची अंमलबजावणी करण्याची सूचना मांडली. संजय निरुपम यांनी विरोध केला नाही. त्यांचे प्रामुख्याने असे म्हणणे होते की, तुम्ही जबरदस्ती कराल, तर ते योग्य होणार नाही. कारण त्यांच्या रोजी-रोटीचा प्रश्न आहे, असे सरनाईक म्हटले आहे.
महाराष्ट्र हे सुसंस्कृत राज्य आहे
मी हे स्पष्टपणे सांगतो की, हे सुसंस्कृत राज्य आहे. महाराष्ट्र राज्य हे नोकरी, धंदा, व्यवसाय निर्माण करणारे राज्य आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात हे सरकार चांगले काम करत आहे. किंबहुना, देशात जास्तीत जास्त रोजगार आणणे, उद्योग आणणे, रोजगार निर्मिती करणे हे आमचे कर्तव्य आहे. या माध्यमातून आम्ही पुढे जात आहोत. पहिल्या क्रमांकाचे राज्य करण्याचा निर्धार आम्ही केला आहे. अशा परिस्थितीत कुणाचा रोजगार हिरावून घेणे आम्हाला चालणार नाही, असेही सरनाईक यांनी सांगितले.
मराठीत संवाद साधलाच पाहिजे
आम्ही स्पष्टपणे सांगतो की, महाराष्ट्रात जो कायदा आहे, त्या कायद्याचे पालन करायला हवे. त्या कायद्यानुसार मराठी भाषेचा, जो ज्या पद्धतीने रिक्षा असेल, टॅक्सी असेल, ओला-उबेर, रॅपिडो, टू व्हिलर चालकांनी मागे बसलेला प्रवासी जर मराठीत बोलत असेल, तर त्यांनीही त्यांच्याशी मराठीत संवाद साधलाच पाहिजे, असे मंत्री प्रताप सरनाईक यांनी अगदी स्पष्ट शब्दांत सांगितले.
Mira Bhayandar, Maharashtra: On Shiv Sena leader and spokesperson Sanjay Nirupam's, Minister Pratap Sarnaik says, "...Maharashtra residents must respect and know Marathi, as it is not just a language but the culture, identity, and pride of the state...." pic.twitter.com/k4PmTmKB14
— IANS (@ians_india) April 24, 2026