कोंकणी ही गोव्याची एकमेव भाषिक अस्मिता असूच शकत नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 08:19 IST2026-04-20T08:17:23+5:302026-04-20T08:19:40+5:30
घरात कोंकणी बोलली जात असूनही माझ्या घरातील लोक स्वतःला अत्यंत अभिमानाने 'मराठीवादी' म्हणवत.

कोंकणी ही गोव्याची एकमेव भाषिक अस्मिता असूच शकत नाही
कौस्तुभ नाईक, लेखक आणि इतिहास संशोधक
गोव्याची अस्मिता केवळ कोंकणी भाषेशीच जोडलेली आहे, या निष्कर्षाप्रत आपण नेमके कधी आणि कसे पोहोचलो ? गोवा हा कायमच असा प्रदेश राहिला आहे जिथे कोंकणी, मराठी, पोर्तुगीज, फारसी, दखनी उर्दू, गुजराती या भाषा वापरात होत्या. या बहुभाषिक इतिहासातून गाळून केवळ विसाव्या शतकात निर्माण केलेल्या नागरी कोंकणी या एकाच भाषिक राष्ट्रवादाच्या चौकटीत कोंबणे हे केवळ अज्ञानाचे लक्षण नाही, तर ते एका विशिष्ट वर्गाचे राजकीय कारस्थान आहे. हे कारस्थान बहुजनांना आपल्या वर्तुळात वरवर जरी सामावून घेत असले, तरी त्यांना मूळ सत्तेच्या परिघाबाहेर ठेवण्याचे काम करते.
घरात कोंकणी बोलली जात असूनही माझ्या घरातील लोक स्वतःला अत्यंत अभिमानाने 'मराठीवादी' म्हणवत. या मागचे राजकीय आणि ऐतिहासिक कारण काय, हे शोधण्यासाठी मी माहिती तंत्रज्ञानातील माझे करिअर सोडून जेव्हा इतिहास संशोधनाकडे वळलो, ऐतिहासिक साधनांचा जेव्हा सखोल अभ्यास सुरू केला, तेव्हा मला या राजकीय भूमिकेचे खरे गांभीर्य समजले.
नव्या काबिजादींचा इतिहास आणि पोर्तुगीज प्रशासनातील नोंदी पाहिल्यास एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, गोव्यातील बहुजन समाजाचे मराठीशी असलेले नाते हे स्वातंत्र्योत्तर काळात किंवा मगोपच्या उदयासोबत निर्माण झालेले नव्हते. वसाहतवादी राजवट संपण्यापूर्वी अनेक दशके, किंबहुना शतके, मराठी हीच येथील उपेक्षितांसाठी जगण्याची, सामाजिक प्रगतीची आणि राजकीय अभिव्यक्तीची प्रमुख भाषा होती.
स्थानिक उच्चवर्णीयांची मक्तेदारी आणि पोर्तुगीज सत्ता यांच्या दुहेरी शोषणातून मार्ग काढण्यासाठी आणि प्रशासनात स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी आमच्या पूर्वजांनी मराठी भाषेचा वापर केला. त्यामुळेच आज बहुजन समाजातील तरुण पिढी जेव्हा कोणत्याही चिकित्सेविना केवळ भावनिक लाटेवर स्वार होऊन या एकसुरी भाषिक अस्मितेला कवटाळते, तेव्हा ते नकळतपणे स्वतःच्याच राजकीय अस्तित्वावर कुन्हाड चालवत असतात.
कोंकणी चळवळीने गोव्यातील शोषित आणि कष्टकरी वर्गाच्या पदरात खऱ्या अर्थाने काय टाकले, याची कठोर समीक्षा करण्याची वेळ आता आली आहे. भारतातील प्रत्येक भाषिक संस्कृतीत तिचा असा स्वतःचा एक प्रबळ जातीविरोधी विमर्श आणि विद्रोही साहित्याची परंपरा आहे. मराठीमुळेच गोव्यातील बहुजनांना जोतीराव फुले आणि डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्या मुक्तीदायी विचारांपर्यंत थेट पोहोचता आले. यामुळे स्वतःच्या शोषणाची पाळेमुळे उखडून टाकण्याची एक वैचारिक ताकद मिळाली.
कोंकणीत अशी विद्रोही परंपरा का निर्माण झाली नाही? स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या चळवळीने इतकी दशके उलटूनही ही जातीअंताची राजकीय जाणीव निर्माण करण्याची तसदी का घेतली नाही?, आपण ज्या समाजात राहतो त्याचे भान लोकांना देणे, तिथल्या कष्टकरी समाजाचे अंतरंग साहित्यात जास्तीत जास्त प्रयत्नांनी आणण्याची कोणालाच गरज का वाटत नाही? कोंकणीमध्ये जातीविरोधी विमर्शाचा हा अभाव ही अनावधानाने झालेली चूक नसून, ती या व्यवस्थेच्या मूळ रचनेचा गाभा आहे. ही भाषिक व्यवस्था बहुजनांना सांस्कृतिक (आणि पर्यायाने राजकीय) सत्तेपासून दूर ठेवते. गोव्याची जमीन, भांडवल आणि साधनसंपत्ती यावर असलेली आपली घट्ट पकड सैल होईल, या उच्चभ्रू ब्राह्मणी भीतीवर ती आधारलेली आहे. लोकशाहीचा खरा अर्थ सत्तेचे आणि साधनसंपत्तीचे तळागाळापर्यंत पुनर्वितरण हाच असतो. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने आणि भाऊसाहेब बांदोडकरांनी नेमके तेच साध्य केले.
गोव्यात लोकशाहीच्या आगमनानंतर वंचितांना सत्तेच्या केंद्रस्थानी बसण्याची संधी मिळाली. मगोपच्या काळात सुरू झालेल्या बहुजन मुक्तीच्या या झंझावातामुळे येथील सत्ताधारी वर्गाच्या पायाखालची वाळू सरकली. यातूनच 'गोवा ही एक वेगळी आणि अद्वितीय भूमी आहे', हा बनाव जाणीवपूर्वक रचण्यात आला. पुरेशी कंठझीज केल्यास देशातील प्रत्येक राज्य स्वतःच्या जागी वेगळेच ठरते. गोवा हे काही अपवादात्मक नाही. त्यामुळे गोव्यातील भाषिक अस्मितेचा हा लढा केवळ भाषेपुरता मर्यादित नाही. जेव्हा बहुजन समाजाने मगोपच्या राजकीय झेंड्याखाली एकत्र येऊन इथली हजारो वर्षांची सामाजिक उतरंड उलथवून टाकली, तेव्हा निर्माण झालेल्या असुरक्षिततेतून या भाषिक राष्ट्रवादाचा जन्म झाला.
बांदोडकरांचे श्रेय नाकारण्याची आणि त्यांची बदनामी करण्याची आजतागायत सुरू असलेली मोहीम याच कटाचा भाग आहे. साहित्याच्या प्रांगणातही हीच दडपशाही आणि वगळण्याची प्रवृत्ती स्पष्टपणे दिसून येते. पुंडलिक नायक हे कदाचित असे एकमेव साहित्यिक आहेत ज्यांनी गोव्यातील बहुजनांच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या व्यथा आणि शोषणाला प्रखरपणे वाचा फोडली. त्यांच्याकडे विपुल आणि हेवा वाटावा, अशी साहित्यसंपदा असूनही त्यांना ज्ञानपीठ पुरस्कारापासून दूर ठेवण्यात आले आहे. यामागचे कारण सर्वश्रुत आहे.
विष्णू वाघ यांच्या 'सुदिरसूक्त' या कवितासंग्रहाला जेव्हा एका साहित्य पुरस्कारासाठी नामांकन मिळाले, तेव्हा इथल्या प्रस्थापितांनी कसा थयथयाट केला आणि काय घडले, हे आपण सर्वांनी पाहिले आहे. हे असे आहे जणू काही ही भाषा आणि इथले प्रस्थापित साहित्यविश्व स्वतःच एक प्रकारची अस्पृश्यता पाळते आणि गोव्यातील जातीय उतरंडीला आव्हान देणाऱ्या कोणत्याही विमर्शाला जाणीवपूर्वक चार हात दूर ठेवले जाते. जेव्हा एखाद्या भाषेला राज्याच्या अस्मितेचा सर्वोच्च दर्जा दिला जातो, परंतु ती बहुसंख्य लोकांच्या भौतिक वास्तवाला स्पर्श करू शकत नाही, तेव्हा ती मुक्तीचे माध्यम न राहता सांस्कृतिक वर्चस्व लादण्याचे एक हत्यार बनते.
गेल्या अनेक दशकांपासून आपल्या माथी मारला जाणारा हा उच्चभ्रूचा इतिहास आपण आता नाकारला पाहिजे. आपला खरा आणि वैविध्यपूर्ण भूतकाळ परत मिळवून या वगळणाऱ्या प्रवृत्तींना आव्हान दिले, तरच आपण खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक समाज उभारू शकू.