कॅटरिंग व्यवसायाला गॅस तुडवड्याचा फटका; किमान ५० टक्के व्यावसायिक गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 08:00 IST2026-04-15T08:00:49+5:302026-04-15T08:00:49+5:30
आम्हाला या संबंधी तोडगा काढण्याचे आश्वसन दिले होते.

कॅटरिंग व्यवसायाला गॅस तुडवड्याचा फटका; किमान ५० टक्के व्यावसायिक गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा: लग्न सराईच्या दिवसांना नुकतीच कुठे सुरुवात झाली आहे. संपूर्ण वर्षभरातील आगामी चार महिने हे आमच्या व्यवसायासाठी लाभदायक असतात. परंतु नेमके या मोक्याच्या क्षणी व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने कॅटरिंग व्यावसायिकांसमोर संकट निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याकडे तातडीने लक्ष देत सरासरी गरजेपेक्षा किमान ५० टक्के पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी अखिल गोवा कॅटरर्स संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.
पत्रकार परिषदेसाठी संघटनेचे अध्यक्ष सुदेश भिंगी यांच्यासह संघटना सचिव महंमद शेख, खजिनदार रोहित नाईक, सदस्य दीपा शिरगावकर, अभिजीत तेली, विघ्नेश गावकर, प्रदोश आमोणकर, गिरीश देसाई, वैभव काणेकर हे पदाधिकारी उपस्थित होते.
यासंदर्भात माहिती देताना भिंगी म्हणाले की, युद्धाचे जे सावट निर्माण झाले आहे त्यामुळे पुरवठ्यावर परिणाम झाला आहे, याची जाण आमच्या संघटनेला आहे. आज घरगुती सिलेंडरचा पुरवठा सुरळीत करण्यात मुख्यमंत्र्यांना यश आले आहे. त्याच धर्तीवर आम्हाला किमान सिलेंडर मिळतील याची तजवीज ते २ करतील अशी आशा आहे.आमच्या संघटनेचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. आठ दिवसापूर्वी आम्ही ही मागणी घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी आम्हाला या संबंधी तोडगा काढण्याचे आश्वसन दिले होते.
चुलीवरील जेवण देण्यातही अडचणी
भिंगी म्हणाले, आम्ही लग्नाच्या ऑर्डर्स अगोदरच घेऊन ठेवलेल्या आहेत. त्यानुसार गुंतवणूकही केलेली आहे. मात्र अचानक तुटवडा भासत असल्याने ग्राहकांना काय स्पष्टीकरण द्यावे असा प्रश्न आमच्या समोर उपस्थित झाला आहे. आमच्या ग्राहकांकडून आम्ही आगाऊ रक्कमही स्वीकारलेली आहे. पूर्वीचे स्वयंपाकी हे चुलीवर जेवण करण्यात पारंगत होते. आताच्या स्वयंपाक्यांची चुलीवर स्वयंपाक करताना त्यांची तारांबळ उडते. त्यामुळे चुलीवरचे जेवणही आम्ही आज देऊ शकत नाही.
सावरत असतानाच पुन्हा धक्का
अडचण लक्षात घेऊन आम्ही काही पदार्थामध्ये कपात करणार. मात्र सरसकट पदार्थ टाळणे अशक्य आहे. आमचे कामगारही आमच्यावरच अवलंबून आहेत. आज व्यवसाय खोळंबल्यास त्यांच्या रोजगारावर गदा येऊ शकते. परत एकदा गावी गेलेला कामगार पुन्हा येताना दिवस काढतो. तो एक वेगळा फटका केटरर्सना बसू शकतो. कोरोनाच्या महामारीतून आमचा व्यवसाय नुकताच कुठे पूर्वपथावर आलेला आहे. त्यात पुन्हा एकदा हे संकट आमच्या समोर उभे झाले आहे.