आवाज कुणाचा, याचा आज फैसला !

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 10:38 AM2019-10-24T10:38:24+5:302019-10-24T10:38:37+5:30

राज्याच्या विधानसभा निवडणुकीची गेल्या सुमारे महिनाभरापासून सुरू असलेली रणधुमाळी दोन दिवसांपूर्वीच्या मतदानाने थंडावली असली तरी, उमेदवारांच्या पातळीवर हे दोन दिवस अतिशय हुरहूर लावणारे ठरले.

Whose voice, decide today! | आवाज कुणाचा, याचा आज फैसला !

आवाज कुणाचा, याचा आज फैसला !

Next

- किरण अग्रवाल

नशिबावर सर्वांचाच विश्वास असतो असे नाही. उलट नशिबावर विसंबून न राहता कर्म करत राहायला हवे असेच सर्वांकडून सांगितले जाते. कर्माचे योग्य ते फळ मिळतेही; परंतु राजकारणाच्या व त्यातही निवडणुकीच्या बाबतीत सारे कर्म करून झाल्यावरही एक वेळ अशी येऊन ठेपते, जेव्हा नशिबावर फै सला सोडून त्याचीच प्रतीक्षा करणे भाग असते. आस्तिक तर अशावेळी सश्रद्धपणे ईश्वरापुढे नतमस्तक होताना दिसून येतातच; पण नास्तिकही नशिबाला न नाकारता या प्रतीक्षाकाळातील समजुतीची कवाडे उघडून बसतात. मतदानानंतरच्या गेल्या दोन दिवसांपासून जे काही सुरू होते, त्याचा आज निर्णय होणार असून, त्याकडे संपूर्ण जनता-जनार्दनाचे लक्ष लागून राहणे स्वाभाविक ठरले आहे.

राज्याच्या विधानसभा निवडणुकीची गेल्या सुमारे महिनाभरापासून सुरू असलेली रणधुमाळी दोन दिवसांपूर्वीच्या मतदानाने थंडावली असली तरी, उमेदवारांच्या पातळीवर हे दोन दिवस अतिशय हुरहूर लावणारे ठरले. प्रचाराची दगदग, धावपळ यातून सुटकारा मिळालेल्या बहुसंख्य उमेदवारांनी या काळात विश्रांती घेणे पसंत केले, तर अनेकांनी आपल्या श्रद्धास्थानांना भेटी देऊन विजयाची आळवणी केली. यात काही गैर अगर वावगे असण्याचे कारण नाही, शेवटी श्रद्धा या मनुष्याला त्याच्या अस्वस्थेच्या काळात मानसिक बळ पुराविणाऱ्याच ठरतात. कर्मासोबत श्रद्धेतून आकारास येणाºया नशिबाचीही जोड लाभली तर दुधात साखर पडल्याची भावना निर्माण होते. शिवाय आयुष्याच्या रहाटगाडग्यात सर्वांनाच सर्व काही केवळ मेहनतीनेच मिळते असे नाही, तर कधी कधी कुणाच्या बाबतीत नशिबाचा फॅक्टरही महत्त्वाचा ठरून जात असल्याचे दिसून येते. निवडणुकीच्याच संदर्भाने बोलायचे तर, वर्षोनुवर्षे राजकारणात राहून व एकनिष्ठेने पक्षकार्य करून कोणत्याही लाभाच्या पदापर्यंत पोहोचू न शकल्याची खंत बाळगणारे कमी नाहीत. उलट आल्या आल्या चाणाक्षपणे राजकारण करीत नेतेपदी पोहोचलेल्यांचीच संख्या अधिक आहे. महापालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडून जाऊ न शकलेले थेट विधिमंडळात पोहोचलेलेही पहावयास मिळाले आहेत. मतदारराजाची कृपा यात असतेच; पण नशिबाची त्यांना लाभलेली साथ दुर्लक्षिता येत नाही. राजकारणात अचूक टायमिंग साधण्याला जे महत्त्व असते ते यासंदर्भाने लक्षात घेता यावे.

महत्त्वाचे म्हणजे, कमी-अधिक मतदानातून काही फैसले घडून येत असतात. यात मतदानाची टक्केवारी वाढलेली दिसून आली तर ती परिवर्तनाची चाहुल देणारी म्हणवते. प्रत्येकच वेळी व प्रत्येक ठिकाणी तसेच होते असेही नाही; परंतु तो सर्वसाधारण समज आहे. टक्का घसरला की मतदारांच्या निरुत्साही मानसिकतेवर बोट ठेवून मागच्या पानावरून पुढच्याला चाल दिले जाण्याचे संकेत त्यातून घेतले जातात. महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीचेच उदाहरण घ्यायचे तर, गेल्यावेळी २०१४ मधील निवडणुकीत २८८ पैकी २१८ मतदारसंघांत मतदानाचा टक्का वाढला होता. त्यामुळे राज्यात परिवर्तन घडून सत्तांतर झाल्याचे म्हणता यावे. तेव्हा, त्याच संदर्भाने यंदाच्या मतदानाकडे बघितले तर केवळ एका मतदारसंघाच्या फरकाने म्हणजे २१७ ठिकाणी यंदा मतदानात गेल्यावेळेपेक्षा घट झालेली दिसून येते. याचा अर्थ यंदा सत्तांतराची अपेक्षा करता येऊ नये. अर्थात, असे म्हणणे अथवा समजणे हा ठोकताळाच असतो. तेव्हा या सर्वच जागांवर सत्ताधाऱ्यांना अनुकूल असे निकाल लागतील असेही नाही, मात्र सर्वसाधारणपणे कल दर्शवणारी ही घट अथवा वाढ म्हणता यावी.

खरे तर कलाचाच विचार करायचा तर ‘एक्झिट पोल’मधून ते निदर्शनास येतेच. परंतु हल्ली या ‘पोल्स’लादेखील ते करणारी संस्था कोणती आहे यावरून रंग चिटकवले जातात. पोल्सची धुळधाण उडवणारे निकाल लागल्याचेही इतिहासात अनेक दाखले आहेत. म्हणजे, अंतिमत: भिस्त येते ती नशिबावरच ! नशिबाचा फै सला त्याच अर्थाने महत्त्वाचा. यातही मोठ्या फरकाने जिथे निकाल लागतात, तिथे नशिबाऐवजी कर्माचा विचार मांडला जाणे गैर ठरू नये; परंतु थोड्या-थोडक्या फरकाने जिथे जय-पराभव पाहण्याची वेळ येते, तेव्हा तिथे नशिबाचीच चर्चा घडून आल्याखेरीज राहात नाही. विशेषत: चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकांत हा ‘फॅक्टर’ अधिक प्रकर्षाने मांडला जातो. यंदाही राज्यात अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती झाल्या आहेत. छातीठोकपणे अंदाज वर्तवता येऊ नये, अशी काही जागांवरची स्थिती आहे. त्यामुळे आज नशिबाच्या पेट्या उघडतील, म्हणजे मतयंत्रातून जे आकडे समोर येतील त्यावरच कळेल की राज्यात ‘आवाज कुणाचा’ ते ! हुरहुर, उत्सुकता, प्रतीक्षा आहे ती त्याचीच.  

 

Web Title: Whose voice, decide today!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.