तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 18:12 IST2026-05-07T18:11:14+5:302026-05-07T18:12:21+5:30
Tamil Nadu Politics: अभिनेता विजय आणि राज्यपाल यांच्या नेमकी काय चर्चा झाली, राजेंद्र आर्लेकरांची नेमकी भूमिका काय?

तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
Tamil Nadu Politics: तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत अभिनेता विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम अर्थात टीव्हीके पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. मात्र, कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने राज्यात 'त्रिशंकू' स्थिती निर्माण झाली आहे. सर्वांत मोठा पक्ष असलेल्या टीव्हीके यांनी राज्यपालांची भेट घेतली खरी, परंतु, बहुमत नसल्याने सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी टीव्हीके पक्ष प्रमुख अभिनेता विजय पुन्हा एकदा लोकभवन येथे गेला होता. परंतु, त्याला रिकाम्या हाती परतावे लागल्याचे म्हटले जात आहे. यानंतर लोकभवन बाहेर असलेल्या कार्यकर्त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या.
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
काँग्रेस आमदारांसह ११२ आमदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा विजयने केला. असे असूनही, त्याला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले नाही. यामुळे संतप्त झालेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चेन्नईतील लोकभवनबाहेर मोठे आंदोलन सुरू केले. तसेच भाजपावर याचे खापर फोडले आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी विधानसभा हे योग्य जागा आहे, लोकभवन नव्हे. बहुमत चाचणी हीच एकमेव योग्य पद्धत आहे आणि राज्यपालांनी त्यानुसार कार्यवाही करावी, असे आंदोलकांचे म्हणणे आहे. १०८ आमदारांसह टीव्हीके हा सर्वांत मोठा पक्ष आहे आणि घटनेनुसार राज्यपालांनी विजय पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी बोलावणे आवश्यक होते.असे घडले नाही, ज्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भूमिका नेमकी काय?
पीटीआयच्या वृत्तानुसार, सरकार स्थापन करण्यासाठी इतर कोणत्याही पक्षाला आमंत्रित करणार नाही, असे आश्वासन राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी विजय यांना दिले आहे. तसेच सत्तास्थापनेसाठी एक प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे. विजय यांनी त्यांच्या समर्थक आमदारांच्या सह्यांची यादी घेऊन परत यावे. प्रत्येक आमदाराच्या सह्यांची यादी सादर केल्याशिवाय शपथविधीची प्रक्रिया पुढे जाणार नाही. पाठिंब्याचा दावा कागदोपत्री पूर्णपणे ठोस असला पाहिजे. सत्ता स्थापनेनंतर सरकार स्थिर राहावे, शपथविधीनंतर ते लगेच कोसळू नये, असेही राज्यपालांनी म्हटल्याचे समोर येत आहे.
दरम्यान, विरोधी पक्षनेते पलानीस्वामी यांनी अद्याप राज्यपालांची भेट मागितलेली नाही. आंदोलने अधिक तीव्र झाली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना संघर्ष करावा लागला. तिरुपूरहून आलेले कार्यकर्ते संतप्त झाले होते आणि लोकशाही प्रक्रियेचे पालन केले जात नसल्याचे त्यांनी म्हटले. शपथविधी सोहळा पार पडेपर्यंत चेन्नईमध्येच थांबण्याचा त्यांनी आता निर्णय घेतला आहे. आपले नेते मुख्यमंत्री झालेले पाहिल्यानंतरच आपण परत येऊ, असे त्यांचे म्हणणे आहे.