पुतण्याचा धावा... काका मला वाचवा!; काय आहे भाजपा अन् अजितदादांची अडचण?

By यदू जोशी | Published: August 18, 2023 08:44 AM2023-08-18T08:44:52+5:302023-08-18T08:46:08+5:30

अजित पवार गटाने 'साहेबां'ची साथ सोडली तरी त्यांना साहेबांचा केवळ फोटोच नव्हे, तर प्रत्यक्ष साहेबच सोबत हवे आहेत. ही अपरिहार्यता का?

ajit pawar and sharad pawar ncp politics | पुतण्याचा धावा... काका मला वाचवा!; काय आहे भाजपा अन् अजितदादांची अडचण?

पुतण्याचा धावा... काका मला वाचवा!; काय आहे भाजपा अन् अजितदादांची अडचण?

googlenewsNext

- यदु जोशी, सहयोगी संपादक, लोकमत

'शरद पवार यांना भाजपसोबत आणत असाल तर तुम्हाला मुख्यमंत्री करू,' अशी अट भाजपने घातली असल्यामुळे अजित पवार सातत्याने शरद पवार यांची मनधरणी करीत असल्याचा तर्क विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिल्यानंतर उलटसुलट प्रतिक्रिया आल्या. पंधरा दिवसांपूर्वी याच ठिकाणी हा तर्क सर्वप्रथम मांडला होता आणि पुतण्याच्या हट्टाला दाद न देणाऱ्या काकांनी पुन्हा एकदा पुतण्याची मुख्यमंत्रिपदाची वाट अडविली असल्याचेही नमूद केले होते. या मनधरणीमागे फक्त हेच कारण आहे, असे मात्र नाही.

अजित पवार आणि भाजपची अडचण वेगळीच आहे. राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले. ते बाळासाहेबांसारखे बोलणारे, परिणामांची चिंता न करता सडकून टीका करणारे. एकंदरीत प्रति बाळासाहेबच! तरीही शिवसेनेचा, बाळासाहेबांचा राजकीय वारसा कोणासोबत गेला? राज बाहेर पडले तेव्हा त्यांच्याभोवती मोठे वलय होते, ते शिवसेना हायजॅक करतील, असे वातावरण होते. राज फायरखंड नेते; उद्धव ठाकरे त्यांच्या मानाने मवाळ पण शेवटी काय झाले? वारसा उद्धव ठाकरेंसोबत गेला. पक्षसंघटना राज यांच्यासोबत फारशी गेली नाही.

अशी बरीच उदाहरणे आहेत. याचा अर्थ राजकीय वारसा हा अपत्याकडे जातो; पुतणे, भाचे यांच्याकडे नाही. अजितदादा आणि भाजपला हीच भीती सतावत असणार. अजित पवार सुप्रिया सुळे यांच्यात नेतृत्व गुणांबाबत तुलना केली तर निश्चितपणे भावाचे पारडे बहिणीपेक्षा जड आहे; पण पवार कुटुंबाला मानणाऱ्या मतदारांनी उद्या मतांची ओवाळणी बहिणीला टाकली तर? भावासाठी हा चिंतेचा विषय असणार.

शरद पवार यांची मराठा समाजावर आजही पकड आहे. ते आपल्यासोबत राहिले नाहीत तर मराठा व्होट बँकेत विभागणी होईल आणि पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या प्रभावपट्ट्यात अपेक्षित यश मिळू शकणार नाही ही भीतीही अजितदादांना सतावत असणार. म्हणून तर ३५ हून अधिक आमदार सोबत असलेले अजित पवार १७ आमदार सोबत असलेल्या काकांची विनवणी करत आहेत. शरद पवारांचा वारसा अजित पवारांकडे यावा आणि अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांना सन्मानाने सोबत घ्यावे, अशी आपल्या परिवाराची पुढची वाटचाल अजित पवार यांना अपेक्षित असावी. तसे केल्याने त्यांचे स्वतःचे नेतृत्व भक्कम बनते. भाजपशी असलेल्या युतीमध्ये त्यांचे महत्त्वही वाढते. शिवाय शरद पवार यांच्यासोबत असलेल्या धर्मनिरपेक्ष मतदारांची साथ मिळण्याची शक्यता कायम राहते.

मात्र, शरद पवार यांना ते नको आहे. भाजपला असलेला विरोध कायम ठेवत सुप्रिया यांचे राजकीय भवितव्य निश्चित करण्याचा जोरकस प्रयत्न त्यांच्यातील पिता करत आहे. शरद पवार महाविकास आघाडीतून बाहेर पडले तर 'मविआ' चे कंबरडे मोडते हे भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाला चांगलेच ठाऊक आहे! त्यामुळे त्यांच्याकडूनही अजितदादांवर काकांना सोबत आणण्याचा दबाव दिसतो.

बंडाचा डाग पुसण्यासाठी....

शरद पवार सोबत आले तर बंडाचा डाग पुसता येईल, हाही एक तर्क आहेच! एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार आजही तो डाग पुसू शकलेले नाहीत. 'वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसणारा नेता' असे प्रतिमाभंजन करणारे बिरुद ८३ वर्षांच्या काकांचा आजही पिच्छा सोडत नाही. त्याची सल मनात असणारच. 'वयोवृद्ध काकांना धोका देणारा पुतण्या' असे बिरुद अजितदादांना आज आणि भविष्यातही अशीच सल देऊन जाईल. ती खंत नको म्हणूनही आर्जव सुरू आहे. विठ्ठल, आराध्य दैवत असा शरद पवार यांचा उल्लेख करत, त्यांचे फोटो मिरवत आजही अजित पवार गट 'आम्ही साहेबांचे आणि साहेब आमचेच' असे भासवण्याचा प्रयत्न का करत आहे? कारण सरळ आहे, साहेबांची साथ सोडली तरी त्यांची प्रतिमा हवी आहे आणि केवळ प्रतिमाच नाही तर प्रत्यक्ष साहेबच सोबत हवे आहेत.

बंडखोरीनंतरही शरद पवार हे अजित पवार यांची नितांत गरज होऊन बसले आहेत. उद्धव ठाकरेंसोबतचे सगळे पाश एकनाथ शिंदे यांनी पहिल्या फटक्यात तोडून टाकले. परिणामांची चिंता केली नाही. अजित पवार यांचे मात्र तळ्यात मळ्यात सुरू आहे. शरद पवार नावाच्या वटवृक्षाची सावली त्यांना हवी आहे रक्ताचे नाते इतके पटकन तुटत नाही हेही कारण असावे कदाचित. दुसरीकडे शरद पवार हे अजित पवारांना भीक घालताना दिसत नाहीत. त्यांनी आणि सुप्रिया सुळे यांनी मोदी भाजपवरील सडकून टीका सुरूच ठेवली आहे. कधीही भाजपसोबत जाणार नाही, असे ते ठणकावून सांगत आहेत.

तीन राज्यांमधील आगामी निवडणुकांत भाजपचा सपशेल पराभव होईल आणि देशातील वातावरण मोदींच्या अधिक विरोधात जाऊन 'इंडिया'ला मोठा फायदा होईल, असा शरद पवार यांचा होरा आहे. २०१९ मध्येही ते असेच म्हणत होते. यावेळी ते अधिक जोरकसपणे तो दावा पुन्हा करत आहेत. आपले फोटो वापरणाऱ्यांविरुद्ध कोटांत जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. याचा अर्थ आता अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना साहेब आणि साहेबांची प्रतिमा याशिवाय पुढची वाटचाल करावी लागणार! ती अधिक अवघड असेल.

आपापल्या भागात प्रचंड प्रभाव असलेले अजितदादांसोबतचे काही आमदार, मंत्री पुन्हा निवडून येतील कदाचित; पण राजकीय भवितव्यासाठी तेवढे पुरेसे नसेल. आमदारांचा आकडा किमान ५० च्या वर नेला तरच सर्वार्थाने नेता म्हणून स्वतःला प्रस्थापित करता येईल. या सगळ्या गोष्टींसाठी अजित पवारांना शरद पवार हवे आहेत, एवढेच!

Web Title: ajit pawar and sharad pawar ncp politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.