"तुमच्यामुळे देव कोपला!"; जात पंचायतीने अजब तर्क देत मायलेकाला चपलेने मारले, लाखोंचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 19:02 IST2026-04-21T19:01:32+5:302026-04-21T19:02:23+5:30
"आत्ताच पैसे द्या, नाहीतर जीवे मारू!" धाराशिवमध्ये जात पंचायतीकडून माय-लेकाचा शारीरिक व मानसिक छळ

"तुमच्यामुळे देव कोपला!"; जात पंचायतीने अजब तर्क देत मायलेकाला चपलेने मारले, लाखोंचा दंड
धाराशिव : धाराशिवमध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे. "तुझा मुलगा आमच्या देवाच्या कार्यक्रमात जेवला, म्हणून देवाचा कोप झाला आणि आमच्या मुलाचा अपघात झाला" असा अजब तर्क लावत एका महिलेला आणि तिच्या मुलाला जात पंचायतीसमोर उभे करण्यात आले. तिथे त्यांना चपलेने मारहाण करून २ लाख ५५ हजारांचा दंड ठोठावत ६० हजार रुपये जबरदस्तीने उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात २० एप्रिल राेजी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी गायत्री शाम चव्हाण (३५, रा. धाराशिव, ह.मु. घाटकोपर, मुंबई) या ६ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास धाराशिव येथील जुना बस डेपो परिसरातील आपल्या घरी होत्या. यावेळी आरोपी सागरबाई जगु पवार, ज्योती ज्योतीराम पवार, ज्योतीराम जगु पवार आणि प्रियंका गणेश पवार यांनी फिर्यादीशी वाद उकरून काढला. फिर्यादीचा मुलगा आरोपींच्या घरातील देवाच्या कार्यक्रमात जेवला होता. या जेवणामुळेच देव कोपले आणि त्यांच्या मुलाचा अपघात झाला, असा अजब तर्क आरोपींनी लावला. हा वाद मिटवण्यासाठी आरोपींनी फिर्यादी माय-लेकाला बळजबरीने तेरखेडा'येथे नेले. तिथे जात पंचायत बसवून पंचांसमोर त्यांना शिवीगाळ करण्यात आली आणि चपलेने बेदम मारहाण करण्यात आली.
या कथित गुन्ह्यासाठी पंचायतीने त्यांना दोषी धरत २ लाख ५५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. "आत्ताच ६० हजार रुपये द्यावे लागतील, नाहीतर उचलून नेऊन जीवे मारू," अशी धमकी आरोपींनी दिली. घाबरलेल्या फिर्यादीने ६० हजार रुपये दिल्यानंतर त्यांची सुटका झाली. अखेर या जाचाला कंटाळून गायत्री चव्हाण यांनी २० एप्रिल रोजी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहितेचे कलम ३०८(२), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) सह महाराष्ट्र सामाजिक वाळीत टाकण्यापासून संरक्षण (जात पंचायत प्रतिबंधक) कायद्याच्या कलम ३, ४, ५, ६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.