कळंब : ‘मागच्या आठवड्यात घरकुलांचे २८२ मस्टर दाखल झाले. मात्र, निघाले केवळ छत्तीसच. बीडीओ साहेब, यास जबाबदार कोण?’ असा संतप्त सवाल करत, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी येथील पंचायत समितीमध्ये झाडाझडती घेतली. यावेळी खासदार, आमदार यांच्यासमोर नागरिक, लाभार्थ्यांसह खुद्द काही पंचायत समिती सदस्यांनीही तक्रारींचा पाऊस पाडला.
खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ.कैलास पाटील यांनी सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास अचानक कळंब पंचायत समितीस भेट दिली. यावेळी सभापती संगिता गोविंद वाघे, उपसभापती गुणवंत पवार, शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिवाजी कापसे, पं.स. सदस्य रामहरी मुंडे, राजेश्वर पाटील, प्रशांत धोंगडे, सतीश शिंदे, प्रदीप मेटे, आश्रुबा बिक्कड, बळवंत तांबारे, भारत सांगळे आदी उपस्थित होते. सभापतींच्या दालनात पदाधिकारी, शेतकरी, लाभार्थी यांनी तक्रारीचा सूर आळवत पं. स.च्या घरकूल, महाग्रारोहयो कक्षात लाभार्थ्यांची अडवणूक होत असल्याचे सांगितले. यावर संतापलेल्या खा. राजेनिंबाळकर यांनी गटविकास अधिकारी एन.पी. राजगुरू यांना विचारणा केली असता, समाधानकारक उत्तरे देता न आल्याने, खासदारांनी त्यांची चांगलीच हजेरी घेतली. कळंब पंचायत समितीच्या महाग्रारोहयो कक्षात अनागोंदी सुरू आहे. लाभार्थ्यांची मस्टर निघत नाहीत. दाखल केलेले चार नंबर दडविले जातात. वेळेत हप्ते मिळत नसल्याने घरकूल लाभार्थी परेशान आहेत. विशेष म्हणजे, याबाबत गटविकास अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही काही उपयोग होत नसल्याचे काही सरपंच,पदाधिकारी, लाभार्थी यांच्यासह पं.स. सदस्यांनी सांगितले. यामुळे खासदार, आमदार यांनी गट विकास अधिकारी यांची तीव्र शब्दांत हजेरी घेतली.
चौकट....
सदस्यांनी आकडेवारीसह मांडली वस्तुस्थिती
यावेळी काही पं.स. सदस्यांनी खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ.कैलास पाटील यांच्याकडे रोहयो कक्षात लाभार्थ्यांची कशी अडवणूक केली जाते, याची सोदाहरण माहिती दिली. यावेळी चालू हप्त्यात दाखल असलेल्या २८२ पैकी केवळ ३६ तर २४ ते ३० जूनदरम्यान १८५ पैकी ५२ मस्टर काढले असल्याचे दर्शविल्यामुळे लाभार्थी त्रासून गेल्याचे सांगितले. यामुळे खा.राजेनिंबाळकर यांनी गटविकास अधिकारी यांना ‘तुम्ही नेमकं करता तरी काय?’ असा जाब विचारत फैलावर घेतले.
थेट वरिष्ठांशी साधला संवाद
कळंब पंचायत समितीमधील अधिकारी, कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी यांच्या कारभारामुळे लाभार्थी, नागरिक त्रस्त होत आहेत. यासंबंधी सूचना देऊनही सुधारणा होत नाही. यामुळे खासदारांनी थेट जि.प.चे मुख्याधिकारी यांना कॉल करत कैफियत मांडली. याशिवाय महाग्रारोहयोसंदर्भात महाग्रारोहयो उपमुख्य कार्यकारी अधिकारी, कंत्राटी कर्मचाऱ्यांसंदर्भात उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांच्याशी संवाद साधत येणाऱ्या अडचणी दूर करण्याच्या सूचना दिल्या.