बालविवाहाच्या भीतीने पळून जाणारी अल्पवयीन मुले रेल्वे स्थानकावर ताब्यात; मोठा अनर्थ टळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 19:59 IST2026-05-04T19:58:51+5:302026-05-04T19:59:22+5:30
सतर्कतेमुळे वाचले बालपण! घरच्यांनी जबरदस्तीने ठरवलेले लग्न टाळण्यासाठी अल्पवयीन मुले निघाली होती मुंबईला; धाराशिवमध्ये रेस्क्यू ऑपरेशन.

बालविवाहाच्या भीतीने पळून जाणारी अल्पवयीन मुले रेल्वे स्थानकावर ताब्यात; मोठा अनर्थ टळला
धाराशिव : घरच्यांनी जबरदस्तीने ठरवलेला बालविवाह टाळण्यासाठी परभणी जिल्ह्यातून रेल्वेने मुंबईला पळून जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांची धाराशिव रेल्वे स्थानकावर सुटका करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते आणि रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे या मुलांना सुरक्षितरीत्या ताब्यात घेण्यात आले असून, यामुळे एक मोठा अनर्थ टळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय मुलगा आणि १५ वर्षीय मुलगी कोणालाही न सांगता बिदर-पनवेल एक्सप्रेस (गाडी क्र. २२१४४) ने मुंबईकडे जात होते. ही मुले बेपत्ता असल्याची माहिती नांदेड येथील सुनील हिवळे आणि जळगाव येथील विजयकुमार वाघमारे यांनी युवा ग्राम विकास मंडळाचे संतोष रेपे यांना दिली. माहिती मिळताच रेपे यांनी लातूरवरून एका कार्यकर्त्याला त्याच गाडीत शोध घेण्यासाठी पाठवले आणि धाराशिव चाईल्ड हेल्पलाईनला पाचारण केले. रेल्वे स्थानकावर पोलीस आणि हेल्पलाईन टीमने या मुलांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता गंभीर बाब समोर आली.
विवाहाचा होता दबाव
संबंधित बालिकेला वडील नाहीत. आई आणि मामाने तिचा विवाह नात्यातील एका मुलाशी ठरवला होता. येत्या ७ मे रोजी हा बालविवाह होणार होता. मात्र, हे लग्न मान्य नसल्याने तिने आपल्या एका ओळखीच्या मुलासोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला. दोन्ही बालके अल्पवयीन असून त्यांच्याकडे पैसे नव्हते. अशा परिस्थितीत मुंबईसारख्या मोठ्या शहरात पोहोचल्यावर त्यांच्यासोबत अनुचित प्रकार घडण्याची शक्यता होती. मात्र, वेळेवर मिळालेल्या माहितीमुळे धाराशिव स्थानकावर त्यांना रेस्क्यू करण्यात आले. या मोहिमेत रेल्वे पोलीस मिरगणे, निलेश कांबळे व त्यांचे पथक, चाईल्ड हेल्पलाईनचे अशोक चव्हाण, वंदना कांबळे, परमेश्वर गवाड आणि युवा ग्राम विकास मंडळाचे संतोष रेपे, बाळासाहेब लाड व संभाजी वळसे यांनी सहभाग घेतला.