ईट : परिसरामध्ये सोयाबीन तसेच जनावरांसाठी खाद्य म्हणून मका पिकाची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली आहे. परंतु, सध्या सोयाबीन पिकावर पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला असून, मका पिकावरदेखील लष्करी अळीमुळे संकट आले आहे.
गेल्या पाच वर्षांपासून खरीप हंगामामध्ये नगदी पीक म्हणून सोयाबीनचा पेरा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यापूर्वी नगदी पीक म्हणून कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात होत होती. परंतु, या पिकावर येणारे किडी व रोग, त्यामुळे होणारे नुकसान व उत्पादनात झालेली घट पाहता कापूस लागवड कमी प्रमाणात होत असून, नगदी पीक म्हणून समजल्या जाणाऱ्या सोयाबीनचा पेरा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मग नक्षत्राच्या मध्यंतरामध्ये पेरणीयोग्य पाऊस झाल्याने बळीराजाने चाढ्यावर मूठ धरली व सोयाबीन, उडीद, तूर, मका पिकाची पेरणी केली. परिसरातील गिरवली, डोकेवाडी, घाटनांदूर, घाटपिंपरी, चांदवड, जोतिबाचीवाडी, पखरूड, नागेवाडी शिवारात या खरीप हंगामामध्ये सोयाबीनचा पेरा सर्वाधिक आहे. आजवर सध्या सोयाबीन पिकावर पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला असून, चारा म्हणून पेरणी केलेल्या मका पिकावर लष्करी अळीने हल्ला चढवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सोयाबीन व मका पिकावरील किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी इमामेक्टीन बेंझोटे या कीटकनाशकाची फवारणी करावी, असे आवाहन मंडळ कृषी अधिकारी रायकर यांनी केले आहे.