कळंब : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी प्रशासनस्तरावर उपाययोजना चालू असताना कोरोना रोखण्यासाठी असलेल्या बाबींकडे नागरिकांनी पाठ फिरविल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे आरोग्य विभागाची मात्र चिंता वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कळंब तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने १०७ जणांचा बळी घेतल्याची आकडेवारी आरोग्य विभागाकडे आहे. या लाटेत ४ हजार ६७० जणांना कोरोनाची लागण झाली. त्यातील ४ हजार ४४७ जण बरे होऊन घरीही परतले. सध्या तालुक्यात ४१ रुग्ण उपचाराधीन आहेत. त्यातील ८ जणांवर उपजिल्हा रुग्णालय तर ३३ जणांवर आयटीआय कोविड उपचार केंद्रावर उपचार सुरू आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी, कोरोनापासून वाचण्यासाठी चार ‘टी’ म्हणजेच ट्रॅक, टेस्ट, ट्रीट आणि टीका या चतु:सूत्रीचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, कोरोना तपासणीसाठी अनेकजण मागे सरकताना दिसत आहेत. ग्रामीण तसेच शहरी भागात प्रशासनाने सुपर स्प्रेडर ठरणाऱ्या व्यक्तींना कोरोना तपासणीसाठी विशेष व्यवस्था केली होती. त्यांच्यामार्फत सर्वसामान्य नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये ही त्यामागची भावना होती. परंतु, कळंब शहर व ग्रामीण भागातही या मोहिमेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. ही गोष्टच तिसऱ्या लाटेसाठी निमित्त ठरू शकते, अशी भीती आरोग्य यंत्रणेकडून व्यक्त केली जात आहे.
प्रशासनाने कोरोनाचे तुलनेने अचूक निदान होते म्हणून आता आरटीपीसीआर चाचण्या वाढविल्या आहेत. आतापर्यंत केलेल्या ७ हजार ३०५ आरटीपीसीआर चाचण्यांत १ हजार ३९४ जण पॉझिटिव्ह आढळले तर १९ हजार ९३७ रॅपिड चाचण्यांत ३ हजार २७६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. मागील आठ दिवसांचा कोरोना चाचण्यांचा अहवाल पाहिला असता तपासणी करून घेणाऱ्यांची संख्या घटल्याचे दिसत आहे. प्रशासनाने होम क्वारंटाईनची सुविधा बंद केल्यानेही तपासणी करण्याचा वेग मंदावल्याचे सांगितले जात आहे.
चौकट -
ग्रामीण भागात निर्बंधांचा विसर
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी हात धुणे, मास्क वापरणे व सुरक्षित अंतर ठेवणे ही उपाययोजना करण्याचे आवाहन प्रशासन नियमित करीत आहे. त्याचबरोबर दवाखाने व औषधी दुकाने वगळता इतर दुकानांना ४ वाजेपर्यंतची वेळ ठरवून दिली आहे. शनिवारी व रविवारी लॉकडाऊनचे आदेश आहेत. या सर्व निर्बंधांचा विसर ग्रामीण भागातील नागरिकांना पडल्याचे दिसत आहे. अनेकांनी मास्कचा वापर बंद केला असून, तेथील दुकानेही पूर्ण दिवस उघडी ठेवली जात असल्याने कोरोना आटोक्यात येणार कसा, असा प्रश्न आता उपस्थित केला जातो आहे.
कोट....
कोरोना संसर्गबाधितांची संख्या जोपर्यंत झिरो होत नाही तोपर्यंत धोका कायम आहे. यासाठी प्रत्येक नागरिकांनी सजग राहणे आवश्यक. कोरोनाची लक्षणे असतील, कोरोनाबाधितांच्या संपर्कात आले असतील अशा मंडळींनी अवश्य तपासणी करून घ्यावी. नागरिकांनी यंत्रणेला सहकार्य केले तरच संभाव्य तिसरी लाट थोपवता येईल.
- डॉ. जीवन वायदंडे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, कळंब