उस्मानाबाद - तुळजापूर शहरासह नळदुर्ग येथील तीन घरे फाेडून अज्ञाताने साेन्या-चांदीचे दागिने तसेच राेख रक्कम मिळून लाखाेंचा ऐवज लंपास केला. ही घटना ५ ते ७ जुलै या कालावधीत घडली. याप्रकरणी अज्ञाताविरूद्ध संबंधित पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, नळदुर्ग येथील साखर कारखाना परिसरात विमल राजपूत या वास्तव्यास आहेत. त्यांचे घर बंद असल्याची संधी साधत अज्ञाताने दरवाजावरील कुलूप ताेडून आत प्रवेश केला. यानंतर घरातील कपाट ताेडून आतील १६ ग्रॅम साेन्याचे व १७ ग्रॅम चांदीचे दागिने लंपास केले. यानंतर चाेरट्यांनी चंद्रकांत बुट्टे यांच्या घराकडे माेर्चा वळविला. त्यांच्या घरासमाेरील दुचाकी (क्र. एमएस ०५-डीजी. १८७१) लंपास केली. चाेरीची ही घटना समाेर आल्यानंतर राजपूत यांनी नळदुर्ग पाेलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरून अज्ञाताविरुद्ध भादंसंचे कलम ४५४, ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी घटना तुळजापूर शहरामध्ये घडली. कन्या शाळा परिसरात राजेंद्र जाधव व जयाजी देवबुडे हे वास्तव्यास आहेत. ही दाेन्ही घरे ७ जुलैच्या रात्री बंद हाेती. हीच संधी साधत अज्ञात चाेरट्यांनी घराच्या दरवाजावरील कुलूप ताेडून आत प्रवेश मिळविला. यानंतर घरातील ९७ ग्रॅम साेन्याचे दागिने व राेख २ लाख १० हजार रुपये असा एकूण मुद्देमाल लंपास केला. चाेरीची ही घटना उघड झाल्यानंतर जाधव व देवबुडे यांनी तुळजापूर पाेलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस करीत आहेत.
चाैकट...
नागरिकांत भीतीचे वातावरण...
मागील काही दिवसांत चाेरट्यांचा धुमाकूळ वाढला आहे. बंद असलेली घरे हेरून चाेरटे संधी साधत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पाेलिसांनी तपासाची चक्रे फिरवून चाेरट्यांना बेड्या ठाेकाव्यात, अशी मागणी हाेत आहे.