तामलवाडी - भरधाव वाहनाने एका ६५ वर्षीय दिव्यांग शेतकऱ्यास जाेराची धडक दिली. या अपघातात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी पावणेआठच्यासुमारास तुळजापूर तालुक्यातील सांगवी काटी शिवारात साेलापूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर घडली.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, तुळजापूर तालुक्यातील सांगवी (काटी) येथील विठ्ठल ज्याेतिबा मगर हे शनिवारी सकाळी साडेसातच्यासुमारास सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गावरून स्वत:च्या शेतातील हनुमान मंदिरात देवपूजा करण्यासाठी जात हाेते. याचवेळी सोलापूरहून तुळजापूरकडे जाणाऱ्या एका चारचाकी वाहनाने दिव्यांग शेतकऱ्यास पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात शेतकरी विठ्ठल मगर यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच तामलवाडी पोलीस ठाण्याचे सपाेनि सचिन पंडित, संजय राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून शनिवारी दुपारी १ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत शेतकरी विठ्ठल मगर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. घटनेची नाेंद तामलवाडी पाेलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
चौकट.......
फरार वाहनाचा शोध सुरू
दिव्यांग शेतकरी विठ्ठल मगर यांना धडक देऊन पसार झालेल्या चारचाकी वाहनाचा शोध तामलवाडीचे पोलीस घेत आहेत. टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असल्याचे पाेलिसांकडून सांगण्यात आले.