उस्मानाबाद : कोरोना संसर्ग कमी झाला असला, तरी तो पूर्णत: नाहिसा होत नाहीये. गेल्या महिन्याभरापाहून अधिक कालावधी झाला, रुग्णसंख्या ही स्थिर राहत आहे. दरम्यान, दुसऱ्या लाटेत तरुण व प्रौढांवर कोरोनाचे संक्रमण झाले होते. आता तरुण व बालकांवर हे संक्रमण सुरू असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
दुसऱ्या लाटेत ४० ते ५० या वयोगटांतील सर्वाधिक रुग्ण आढळून येत होते. त्या पाठोपाठ चाळिशीच्या आतील तरुणांचा क्रमांक होता. आता लहान बालकांमध्ये कोरोनाचे संक्रमण वाढत असल्याचे दिसून येत आहे. असे असले, तरी संख्या मोठी नसल्याने तूर्त कोणतेही मोठे संकट समोर नाही. दरम्यान, अनलॉकनंतर नागरिकांमधील कोरोनाची भीती बहुतांशी कमी झालेली दिसून येत आहे. त्यामुळे मास्क व सुरक्षित अंतराच्या नियमाकडे कानाडोळा होतोय. परिणामी, दैनंदिन रुग्णसंख्या ही पन्नाशीखाली यायला तयार नाही. शुक्रवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार, जिल्ह्यात ५५ बाधित आढळून आले आहेत. यातील ८५६ आरटीपीसीआर चाचण्यांतील २८ तर १०९४ रॅपिड अँटिजन टेस्टमधून २७ रुग्ण सापडले. यातही १८ ते ४० या वयोगटांतील सर्वाधिक २३ रुग्ण आहेत, तर अठरा व त्या आतील वयाची ८ बालके बाधित आढळून आली आहेत. याच दिवशी ६५ रुग्ण बरे होऊन परतल्याची नोंदही घेण्यात आली आहे.
शुक्रवारी आढळलेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक २२ रुग्ण हे उस्मानाबाद तालुक्यातील आहेत. त्या पाठोपाठ कळंब तालुक्यात १०, लोहारा व तुळजापूर प्रत्येकी ५, भूम व परंडा प्रत्येकी ४, उमरगा ३ तर वाशी तालुक्यात २ रुग्ण आढळून आले आहेत. शुक्रवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यात ५७८ रुग्ण हे उपचाराखाली होते.