"तिची आई एकदाही भेटायला आली नाही, औषधं सुरू होती"; ट्विशा शर्माच्या सासूचे खळबळजनक दावे
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 20:56 IST2026-05-18T20:48:29+5:302026-05-18T20:56:30+5:30
नोएडातील ट्विशा शर्मा प्रकरणात तिच्या सासूने अनेक खळबळजनक दावे केले आहेत.

"तिची आई एकदाही भेटायला आली नाही, औषधं सुरू होती"; ट्विशा शर्माच्या सासूचे खळबळजनक दावे
Twisha Singh Death Case: भोपाळमध्ये ट्विशा शर्माच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला आता एक वेगळे वळण लागले आहे. या प्रकरणात हुंडाबळी आणि छळाचे आरोप होत असतानाच, ट्विशाची सासू गिरबाला सिंह आणि त्यांच्या वकिलांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच ट्विशाच्या मानसिक आरोग्याबाबत धक्कादायक दावे केले आहेत.
नोएडाची राहणारी डिजिटल मीडिया क्षेत्रातील ट्विशा शर्मा हिचा विवाह डिसेंबर २०२५ मध्ये भोपाळच्या समर्थ सिंहसोबत झाला होता. मात्र, लग्नानंतर अवघ्या ५ महिन्यांत, म्हणजेच १२ मे रोजी रात्री ट्विशाने गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेनंतर ट्विशाच्या कुटुंबीयांनी सासरच्यांवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या आरोपांना उत्तर देण्यासाठी ट्विशाची सासू गिरबाला सिंह यांनी आपली बाजू मांडली.
'तिला सिजोफ्रेनियाची औषधे सुरू होती'
माध्यमांशी बोलताना गिरबाला सिंह यांनी ट्विशाच्या मानसिक आरोग्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ट्विशाची सायकेट्रिक कौन्सिलिंग सुरू होती. तिला अशी औषधे दिली जात होती, जी सामान्यतः सिजोफ्रेनिया असलेल्या रुग्णांना दिली जातात. औषध घेतल्यावर ती एक-दोन दिवस ठीक राहायची, पण नंतर तिचे वर्तन अचानक बदलायचे, असं गिरबाला सिंह म्हणाल्या. कमी वयात तिला ग्लॅमर वर्ल्डमध्ये ढकलण्यात आले, ज्यामुळे तिच्यावर प्रचंड मानसिक दबाव असावा, असा संशय सासूने व्यक्त केला.
गर्भपाताचा निर्णय
ट्विशा गरोदर होती आणि घरात आनंदाचे वातावरण होते. मात्र, डॉक्टरांनी नकार दिलेला असतानाही तिने स्वतःच्या मर्जीने गर्भपात करून घेतला. ज्या दिवशी तिने औषधांचा पहिला कोर्स सुरू केला, त्याच्या दुसऱ्याच दिवशी तिने ते रिव्हर्स करण्याची मागणी केली, असा दावा सासूने केला आहे.
माहेरच्यांवर आरोप
"गेल्या ५ महिन्यांत तिचे आई-वडील एकदाही तिला भेटायला आले नाहीत. मी स्वतः तिच्या आईला फोन करून तिला तुमची गरज आहे असे सांगितले होते, पण त्या आल्या नाहीत. ते लोक केवळ तिच्या सौंदर्याचा वापर करून पैसे कमावत होते," असा गंभीर आरोप त्यांनी केला.
८ लाख रुपये हुंडा दिला की घेतला?; वकिलांचा प्रतिदावा
या प्रकरणात सासू गिरबाला सिंह आणि पती समर्थ सिंह यांचे वकील इनोश जार्ज कारलो यांनी धक्कादायक माहिती दिली. मुलीच्या कुटुंबीयांनी २ लाख रुपयांच्या हुंड्याची मागणी केल्याचा आरोप केला आहे. मात्र, वकिलांनी दावा केला की, गेल्या ४-५ महिन्यांत पती समर्थ सिंह यानेच ट्विशाच्या बँक खात्यात यूपीआयद्वारे तब्बल ८ लाख रुपये पाठवले होते. याच्या पावत्या कोर्टात सादर करण्यात आल्या. जर पती पैसे देत होता, तर तो हुंडा कसा मागेल? असा सवाल वकिलांनी केला.
अॅमेझॉन पार्सलची चौकशी व्हावी
ट्विशाच्या मृत्यूनंतर त्यांच्या घरी अॅमेझॉनचे दोन पार्सल आले होते, त्याची आणि तिच्या बँक खात्यातील पैशांचा वापर कुठे झाला, याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी वकिलांनी केली आहे.
तिचा छळ सुरू होता; माहेरच्यांचा आरोप
दुसरीकडे, ट्विशाच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की सासरच्यांकडून तिचा सातत्याने छळ केला जात होता. मृत्यूच्या काही वेळ आधीच ट्विशाने तिच्या आईला फोन केला होता. माझा प्रचंड छळ केला जात आहे, आता हा त्रास मी सहन करू शकत नाही, असे तिने आईला रडत सांगितले होते. या फोननंतर काही वेळातच तिचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.
पती समर्थ सिंह फरार; पोलिसांकडून बक्षीस जाहीर
या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि ट्विशाचा पती समर्थ सिंह याने अटकेपासून वाचण्यासाठी कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, कोर्टाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. समर्थ सिंह सध्या फरार असून, पोलिसांनी त्याला अटक करण्यासाठी १०,००णी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.