ना पोलीस आले, ना जागेवर तपास झाला; महत्त्वाचे पुरावेही गायब! ट्विशा शर्मा मृत्यूप्रकरणात उभे राहिले ३ मोठे प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 12:47 IST2026-05-19T12:47:05+5:302026-05-19T12:47:38+5:30
ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणाच्या तपासात हलगर्जीपणा, शवविच्छेदनावेळी बेल्टच गायब

ना पोलीस आले, ना जागेवर तपास झाला; महत्त्वाचे पुरावेही गायब! ट्विशा शर्मा मृत्यूप्रकरणात उभे राहिले ३ मोठे प्रश्न
भोपाळमधील हायप्रोफाईल ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणाचे गूढ दिवसेंदिवस अधिकच गडद होत चालले आहे. दररोज समोर येणाऱ्या नवनवीन खुलाशांमुळे पोलीस प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. भोपाळ एम्सच्या पोस्टमार्टम रिपोर्टमधून आता पोलिसांचा अत्यंत धक्कादायक आणि गंभीर निष्काळजीपणा उघड झाला आहे. ज्या बेल्टने ट्विशाने गळफास घेतल्याचा दावा सासरच्यांकडून केला जात आहे, तो बेल्ट पोलीस ऑटोप्सीच्या वेळी डॉक्टरांकडे घेऊनच गेले नव्हते! या मोठ्या हलगर्जीपणामुळे आता पुरावे नष्ट करण्याचा किंवा त्यात फेरबदल करण्याचा प्रयत्न झाला का? असे अनेक संशयास्पद प्रश्न निर्माण झाले आहेत.
विशेष म्हणजे, या प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाचे प्रमुख आणि सहायक पोलीस आयुक्त रजनीश कश्यप यांनी तपास अधिकाऱ्याची ही मोठी चूक मान्य केली आहे. त्यांनी सांगितले की, नंतर तो बेल्ट फॉरेन्सिक टीमकडे सोपवून एम्समध्ये जमा करण्यात आला होता. या संपूर्ण प्रकरणाने आता नाट्यमय वळण घेतले असून, तपासादरम्यान ३ मोठे प्रश्न उपस्थित होत आहेत.
पोलिसांना न बोलवता शव रुग्णालयात का नेले?
ट्विशाचा मृतदेह भोपाळच्या कटरा हिल्स येथील तिच्या सासरच्या घरात लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. तिची सासू आणि पती समर्थ सिंह यांनी पोलिसांना कोणतीही पूर्वकल्पना न देता किंवा घटनास्थळी न बोलवता मृतदेह स्वतःहून खाली उतरवला आणि थेट रुग्णालयात घेऊन गेले. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. यामुळे पोलिसांना घटनास्थळाचा पंचनामा करता आला नाही आणि पुरावे गोळा करता आले नाहीत. "सासरच्या लोकांनी आधीच सर्व पुरावे नष्ट केले असावेत," असा आरोप ट्विशाच्या पालकांनी केला आहे. एसीपी कश्यप यांच्या मते, कोणत्या परिस्थितीत शव रुग्णालयात नेण्यात आले, याचा तपास करण्यासाठी घरातील सीसीटीव्ही फुटेज खंगाळले जात आहेत.
सासूचे ड्रग्ज आणि मानसिक आजाराचे आरोप; पण पोलिसांना पुरावे मिळेनात!
माहेरच्या लोकांनी हुंड्यासाठी हत्येचा आरोप केल्यानंतर, आता ट्विशाची सासू आणि निवृत्त न्यायाधीश गिरीबाला सिंह यांनी उलट ट्विशावरच गंभीर आरोप केले आहेत. गिरीबाला सिंह यांचा दावा आहे की, "माझी सून ट्विशा हिला ड्रग्जचे भयंकर व्यसन होते. गरोदरपणातही तिने मोठ्या प्रमाणावर नशा केली होती आणि ती मानसिकरित्या आजारी होती. तिने स्वतः डॉक्टरांसमोर ही कबुली दिली होती आणि त्यामुळेच तिला गर्भपात करायचा होता."
या दाव्यांना खोडून काढण्यासाठी त्यांनी काही ऑनलाइन बँक ट्रान्झॅक्शनच्या पावत्या सादर केल्या आणि सांगितले की, त्या ट्विशाला ५ हजारांपासून ५० हजारांपर्यंत पैसे पाठवत असत. सासरच्यांनी असाही आरोप केला की, गेल्या ५ महिन्यांत तिचे आई-वडील तिला एकदाही भेटायला आले नाहीत. मात्र, पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, सासूने केलेल्या ड्रग्जच्या आणि मानसिक आजाराच्या दाव्यांना पुष्टी देणारा कोणताही पुरावे अद्याप मिळालेला नाही.
व्हॉट्सॲप चॅटने उघडले सासरचे क्रूर रूप; "आयुष्य नरक बनलंय..."
दुसरीकडे, सोशल मीडियावर ट्विशा आणि तिच्या आईमधील व्हॉट्सॲप चॅटचे स्क्रीनशॉट्स व्हायरल झाले आहेत, जे सासरच्या लोकांचे क्रूर रूप दाखवतात. या चॅटमध्ये ट्विशा रडत रडत आपल्या आईला सांगत आहे की, "माझं आयुष्य नरक बनलं आहे, मला प्लीज इथून परत घेऊन जा." एका चॅटमध्ये ती म्हणते, "पती समर्थ माझ्यावर संशय घेत आहे आणि विचारत आहे की, तुझ्या पोटात कुणाचं मूल होतं, ज्याचा तू गर्भपात केलास? समर्थला माझ्या बाबांना नाक घासून माफी मागायला लावायची आहे."
१५ किलो वजन घटले
ट्विशाची चुलत बहीण मीनाक्षीने दावा केला आहे की, सासरच्या छळामुळे आणि मानसिक त्रासामुळे ट्विशाचे वजन चक्क १५ किलोने कमी झाले होते. जेव्हा तिची नोकरी गेली आणि ती गरोदर राहिली, तेव्हा छळ पराकोटीला पोहोचला. तिच्या पतीने पोटच्या मुलाला स्वीकारण्यास नकार दिला होता.
या अन्यायाविरोधात ट्विशाच्या कुटुंबीयांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या निवासस्थानाबाहेर तीव्र निदर्शने केली. "सासरचे लोक न्यायव्यवस्थेशी संबंधित असल्याने भोपाळ पोलीस दबावाखाली काम करत आहेत," असा आरोप करत कुटुंबाने ट्विशाचा मृतदेह अजूनही एम्सच्या शवागारात ठेवला आहे. त्यांची मागणी आहे की, हा मृतदेह दिल्लीला पाठवून दिल्ली एम्समध्ये पुन्हा एकदा निष्पक्ष पोस्टमार्टम करण्यात यावे. दरम्यान, मुख्य आरोपी पती समर्थ सिंह अजूनही फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.