भारती सिंह घटस्फोट घेणार? हर्ष लिंबाचियासोबत बिनसल्याच्या चर्चांवर म्हणाली, "आम्ही दोघं..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 13:43 IST2026-05-19T13:36:21+5:302026-05-19T13:43:43+5:30
९ वर्षांनंतर मोडला भारतीचा संसार? म्हणाली...

भारती सिंह घटस्फोट घेणार? हर्ष लिंबाचियासोबत बिनसल्याच्या चर्चांवर म्हणाली, "आम्ही दोघं..."
कॉमेडी क्वीन भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया हे नवरा बायको सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. त्यांना गोला आणि काजू ही दोन गोंडस मुलं आहेत. भारती तिच्या युट्यूब व्लॉगमधून दैनंदिन रुटीनमधील अपडेट्स दाखवत असते. दोन्ही मुलांसोबतची त्यांची मस्तीही कॅमेऱ्यात कैद करते. मात्र काही दिवसांपासून हर्ष आणि भारती घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यावर आता भारतीने उत्तर दिलं आहे.
भारती सिंहने तिच्या व्लॉगमध्ये खुलासा केला आहे. भारती म्हणते, "मी आता हर्षसोबत राहू शकत नाही. आमच्यात आता बिनसलं आहे. इरिटेशन होत आहे. बऱ्याच गोष्टी आहेत ज्या सहन करण्याच्या पलीकडे आहेत. आमच्या नात्यात आता मोठी दरी निर्माण झाली आहे आणि आम्ही वेगळे होत आहोत."
पण नंतर भारती चिडून म्हणते, "अशा बऱ्याच तथ्यहिन बातम्या सध्या मी बघत आहे ज्या अतिशय चुकीच्या आहेत. आम्ही कधीच वेगळे होऊ शकत नाही. मेल्यानंतरही वेगळे होणार नाही. मी आणि हर्ष नेहमीच सोबत होतो आणि राहू."
हर्ष लिंबाचिया आणि भारती सिंहने २०१७ मध्ये लग्नगाठ बांधली. २०२२ मध्ये त्यांना लक्ष्य हा मुलगा झाला. त्याला प्रेमाने गोला म्हणतात. नंतर ४ वर्षांनी २०२६ मध्ये त्यांना दुसरा मुलगा झाला. त्याचं नाव यशवीर ठेवण्यात आलं. त्याला प्रेमाने काजू असं नाव दिलं. भारती नवरा आणि दोन्ही मुलांसह सुखाचा संसार करत आहे.