प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 16:32 IST2026-04-19T16:30:23+5:302026-04-19T16:32:54+5:30
कानपूरमध्ये घडलेल्या जुळ्या मुलींच्या हत्येच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. स्वतःच्या वडिलांनीच ११ वर्षांच्या निष्पाप मुलींची निर्घृण हत्या केल्याने संताप व्यक्त होत आहे.

प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये घडलेल्या जुळ्या मुलींच्या हत्येच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. स्वतःच्या वडिलांनीच ११ वर्षांच्या निष्पाप मुलींची निर्घृण हत्या केल्याने संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणात आईने केलेले धक्कादायक खुलासे समोर येत असून, घरातील वातावरणच भयावह असल्याचे उघड झाले आहे.
नेमकं काय घडलं?
कानपूरमधील नौबस्ता परिसरातील त्रिमूर्ती अपार्टमेंटमध्ये शशि रंजन मिश्रा नावाच्या व्यक्तीने आपल्या ११ वर्षांच्या जुळ्या मुलींची हत्या केली. या घटनेनंतर परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, आरोपीने स्वतःच पोलिसांना फोन करून गुन्ह्याची कबुली दिली.
“घर नव्हतं, तुरुंग होता” – आईचा आरोप
मुलींची आई रेशमा हिने पोलिसांसमोर दिलेल्या माहितीत अनेक धक्कादायक बाबी उघड केल्या. तिच्या म्हणण्यानुसार, शशीने संपूर्ण फ्लॅटमध्ये सहा सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. घरात एक गुप्त खोली होती, जिथे तिला जाण्याची परवानगी नव्हती. तो स्वतः त्या खोलीत राहायचा आणि मुलींनाही तिथेच झोपवायचा. रेशमाला फक्त सीसीटीव्ही फुटेजद्वारेच मुलींना पाहण्याची मुभा होती. त्यामुळे घरातील वातावरण पूर्णपणे त्याच्या नियंत्रणाखाली आणि संशयाच्या छायेत होते.
प्रेमातून संशय, आणि संशयातून क्रौर्य
रेशमा ही पश्चिम बंगालमधील सिलीगुडीची रहिवासी असून शशी हा बिहारचा आहे. २०१४ मध्ये दोघांनी प्रेमविवाह केला होता. सुरुवातीला सगळं सुरळीत होतं, मात्र जुळ्या मुलींच्या जन्मानंतर शशी दारूच्या आहारी गेला. हळूहळू त्याचा स्वभाव संशयी झाला. तो पत्नीवर वारंवार संशय घेत असे आणि घरात वाद घालत असे. “मुलाला घेऊन जा, मुली माझ्याकडेच राहतील,” असे तो वारंवार म्हणत असल्याचा आरोप रेशमाने केला आहे.
हत्येच्या रात्री काय घडलं?
घटनेच्या रात्री सुमारे १.३० वाजता रेशमाने सीसीटीव्हीत एक मुलगी वॉशरूमला जाताना पाहिली होती. त्या वेळी सर्व काही सामान्य दिसत होते. मात्र पहाटे ४.३० वाजता शशीने स्वतः पोलिसांना फोन करून दोन्ही मुलींची हत्या केल्याची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा शशि शांतपणे मुलींच्या रक्ताने माखलेल्या मृतदेहाजवळ बसलेला होता. त्याने कोणताही विरोध न करता स्वतःला पोलिसांच्या ताब्यात दिले.
आईची हंबरडा फोडणारी मागणी
या घटनेनंतर रेशमा पूर्णपणे कोलमडली आहे. तिने आपल्या मुलाला कवेत घेत न्यायाची मागणी केली आहे. “ज्याच्यावर प्रेम केलं, त्यानेच माझ्या मुलींचा जीव घेतला,” असे म्हणत तिने आरोपीला कठोरात कठोर शिक्षा म्हणजेच फाशी देण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून सध्या चौकशी सुरू आहे. हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे झाली, याचा तपास सुरू असून अनेक पैलूंवर चौकशी केली जात आहे.