दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 17:45 IST2026-04-19T17:40:14+5:302026-04-19T17:45:06+5:30
Iran Strait of Hormuz Latest Update: होर्मुझ सामुद्रधुनी इराणने वाहतुकीसाठी पुन्हा बंद करण्यास सुरुवात केली आहे. दोन भारतीय जहाजांवर गोळीबार करण्यात आल्यानंतर होर्मुझमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
आयआरजीसी अर्थात इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्स या इराण लष्कराचा भाग असलेल्या नौदलाने होर्मुझ सामुद्रधुनी पार करत असलेली दोन तेल जहाजे परत पाठवली आहे. आयआरजीसीशी संलग्नित असलेल्या तस्नीम वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये इराणच्या नौदलाने नाकेबंदी सुरू केली असून, इराणच्या सशस्त्र दलाने रविवारी (१९ एप्रिल) दोन तेल जहाजांना परत पाठवले.
तस्नीम वृत्तसंस्थेने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, ही तेल जहाजे रविवारी होर्मुझ सामुद्रधुनी पार करण्याच्या प्रयत्नांमध्ये होती. त्यांना नौदलाच्या सशस्त्र जवानांनी परत माघारी जाण्यास सांगितले.
दोन जहाज कोणत्या देशाची?
बोत्सवाना आणि अंगोलाचे झेंडे असलेली ही दोन जहाजे होती. दोन्ही तेल जहाज होर्मुझ पार करण्याच्या प्रयत्न करत होती. पण, त्याचवेळी इराणच्या नौदलाने त्यांना पुढे न येण्यास बजावले. रस्ता बदलून परत माघारी जाण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे ही दोन्ही जहाजे परत गेली.
इराणने होर्मुझ सामुद्रधुनी परत बंद का केली?
अमेरिका आणि इराणमध्ये शस्त्रसंधी झाली आणि युद्ध थांबवण्यासाठी चर्चाही सुरू झाल्या. पण, इस्लामाबादमधील चर्चा फिस्कटल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक निर्णय घेतला. हा निर्णय होता इराणची बंदरे आणि इराणच्या बाजूने असलेली होर्मुझ सामुद्रधुनीची नाकेबंदी करण्याचा.
भारतीय जहाजांवरही गोळीबार
अमेरिकेने नाकेबंदी करत इराणच्या बंदरांकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या जहाजांना रोखले. त्यामुळे संतापलेल्या इराणने शनिवारी थेट संपूर्ण सामुद्रधुनीच बंद करण्याचा निर्णय घेतला. याचा फटका भारतीय जहाजांनाही बसला. भारतीय तेल जहाजांना इराणच्या लष्कराने परवानगी दिली. पण, नंतर गोळीबार करत माघारी पाठवण्यात आले.
इराणच्या आयआरजीसीने भारताच्या दोन तेल जहाजांना होर्मुध सामुद्रधुनीतून जाण्यास परवानगी देण्यात आली होती. पण, होर्मुझकडे निघालेल्या जहाजांना ऐनवेळी रोखण्यात आले. त्यांना माघारी जाण्यास सांगण्यात आले आणि गोळीबारही करण्यात आला. यानंतर भारताने आपला तीव्र संताप इराणला कळवला.