२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर जागतिक क्रिकेटमध्ये असा एक विक्रम नोंदवला गेला आहे, जो मोडणे जगातील कोणत्याही फलंदाजासाठी जवळपास अशक्य मानले जाते.

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर जागतिक क्रिकेटमध्ये असा एक विक्रम नोंदवला गेला आहे, जो मोडणे जगातील कोणत्याही फलंदाजासाठी जवळपास अशक्य मानले जाते. 'हिटमॅन' म्हणून ओळखला जाणारा ३८ वर्षीय रोहित शर्मा आपल्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर आयसीसी वनडे रँकिंगमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे.

264 धावांची खेळीच नाही, रोहित शर्माच्या नावावर हा 'विराट' विक्रमही - रोहित शर्माच्या नावे एकदिवसीय क्रिकेटमध्ये एक-दोन नव्हे तर तब्बल तीन द्विशतकांंचा 'विराट' विक्रम आहे. अशी कामगिरी करणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे.

रोहित शर्माने २ नोव्हेंबर २०१३ रोजी बेंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध १५८ चेंडूत २०९ धावांची खेळी केली होती. या खेळीत त्याने १२ चौकार आणि १६ षटकार फटकावले होते. भारताने हा सामना ५७ धावांनी जिंकला.

१३ नोव्हेंबर २०१४ रोजी रोहितने कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर श्रीलंकेविरुद्ध तब्बल २६४ धावांची ऐतिहासिक खेळी केली होती. हा एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक स्कोअर आहे. या खेळीत त्याने ३३ चौकार आणि ९ षटकार ठोकले होते.

यानतंर, १३ डिसेंबर २०१७ रोजी रोहितने मोहालीत श्रीलंकेविरुद्धच आपले तिसरे द्विशतक झळकावले. या सामन्यात त्याने नाबाद २०८ धावांची खेळी खेळली होती. विशेष म्हणजे, पहिल्या १०० धावा पूर्ण करण्यासाठी त्याने ११५ चेंडू घेतले, मात्र या पुढच्या १०० धावा त्याने अवघ्या ३६ चेंडूतच अक्षरशः कुटल्या. महत्वाचे म्हणजे कर्णधार म्हणून वनडे क्रिकेटमधील ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे.

कर्णधार म्हणून सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या भारताचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागच्या नावावर आहे. त्याने ११ डिसेंबर २०११ रोजी इंदूरच्या होळकर स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्ध २१९ धावांची स्फोटक खेळी खेळली होती.

कारकीर्द आणि आकडेवारी : रोहित शर्माने २३ जून २००७ रोजी आयर्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून आतापर्यंत त्याने २८२ वनडे सामन्यांमध्ये ४८.८४ च्या सरासरीने ११५७७ धावा केल्या आहेत. यात ३ द्विशतके, ३३ शतके आणि ६१ अर्धशतकांचा समावेश आहे.

फलंदाजीसोबतच त्याने वनडेमध्ये ९ बळीही घेतले आहेत. तो सुरुवातीला मधल्या फळीत फलंदाजीसाठी येत होता. मात्र, त्याने सलामीवीर म्हणून संधी मिळताच धावांचा पाऊस पाडत क्रिकेट विश्वात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.