दगडफेक केली, AC तोडले... लोकांच्या संतापाचा उद्रेक; गरिबांचे पैसे हडपल्याचा सरपंचावर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 15:39 IST2026-05-18T15:38:59+5:302026-05-18T15:39:46+5:30
हावडामधील आमता विधानसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणाऱ्या कश्मुली ग्रामपंचायतीमध्ये सोमवारी ग्रामस्थांच्या प्रचंड आक्रोशामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला.

फोटो - आजतक
हावडामधील आमता विधानसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणाऱ्या कश्मुली ग्रामपंचायतीमध्ये सोमवारी ग्रामस्थांच्या प्रचंड आक्रोशामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. स्थानिक कश्मुली ग्रामपंचायतीचे सरपंच तरुण दलुई यांच्या निवासस्थानावर एका संतप्त जमावाने अचानक हल्ला केला आणि परिसरात प्रचंड तोडफोड केली. गावातील संतप्त लोकांनी सरपंचांच्या घराला टार्गेट करत मालमत्तेचं मोठं नुकसान केलं.
घटनेची माहिती मिळताच जॉयपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि मोठा पोलीस फौजफाटा तातडीने घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गावकऱ्यांच्या या संतापाचे मुख्य कारण स्थानिक पातळीवर सुरू असलेला आर्थिक भ्रष्टाचार आहे. तरुण दलुई यांनी सरकारी आवास योजनेअंतर्गत गरिबांसाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीचा अपहार केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
सरपंचांच्या घराला वेढा घालून हल्ला
सरकारी योजनांशी संबंधित 'जॉब कार्ड'च्या मजुरीचे पैसेही लाभार्थ्यांपर्यंत पोहोचू दिले नाहीत आणि ते हडप केले, असाही आरोप आहे. आपल्या हक्काची कमाई आणि सरकारी मदत न मिळाल्याने त्रस्त झालेल्या गावकऱ्यांच्या संयमाचा बांध सुटला आणि त्यांनी सामूहिकपणे सरपंचांच्या घराला वेढा घालून हल्ला केला.
लोकांनी कायदा हातात घेतला
या संपूर्ण घटनेबाबत हावडा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुबिरमल पाल यांनी फोनवरून अधिकृत दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितलं की, 'जॉब कार्ड' आणि त्याच्याशी संबंधित पेमेंटवरून स्थानिक लोकांमध्ये गंभीर वाद निर्माण झाला होता. हा वाद वाढल्याने स्थानिक लोकांनी कायदा हातात घेतला आणि सरपंचाच्या घरावर हल्ला केला.
पोलीस अधीक्षक सुबिरमल पाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेतली असून, या हिंसाचारात आणि तोडफोडीच्या घटनेत सामील असलेल्या दोषींची ओळख पटवून त्यांच्याविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई सुरू केली जात आहे.