राष्ट्रपतींच्या नागपूर दौऱ्याअगोदर महालात सशस्त्र गुंडांचा गोंधळ, डझनाहून अधिक वाहने फोडली
By योगेश पांडे | Updated: February 25, 2026 00:35 IST2026-02-25T00:34:47+5:302026-02-25T00:35:43+5:30
तीन गुंड ताब्यात, शहरात खळबळ

राष्ट्रपतींच्या नागपूर दौऱ्याअगोदर महालात सशस्त्र गुंडांचा गोंधळ, डझनाहून अधिक वाहने फोडली
योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: महाल परिसरात मंगळवारी रात्री उशीरा सशस्त्र गुंडांनी भर रस्त्यावर राडा करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हातात तलवारसदृश शस्त्रे घेत आरोपी रस्त्यांवरून फिरले व महालातील डझनाहून अधिक वाहने फोडली. या प्रकरणाची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणावर पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळाजवळ पोहोचले. ‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार त्यातील तीन गुंडांना ताब्यात घेण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्याच्या अगोदरच्या रात्री शहरात कडेकोट बंदोबस्त असताना असा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महालातील शिवाजी पुतळा चौकाकडून राम कूलर्स चौकाकडे जाणारा मार्ग व आतील भागांत हा प्रकार घडला. सुमारे १२ ते १५ अज्ञात तरुण हातात शस्त्रे घेऊन शिवीगाळ करत रस्त्यावरून जात होते. जोहरीपुऱ्याकडून ते राम कूलर चौकाकडे गेले. त्यांनी परिसरातील मार्गांवर उभ्या असलेल्या वाहनांचीदेखील तोडफोड केली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास डझनाहून अधिक वाहने फोडण्यात आली. परिसरातील लोकांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. कोतवाली पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. सोबतच उपायुक्त राहुल मदने हेदेखील तेथे पोहोचले. महालातील विविध भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला व आरोपींच्या शोधाला सुरुवात झाली. पोलिसांनी तीन तरुणांना ताब्यात घेतले असून मध्यरात्रीनंतर त्यांची चौकशी सुरू होती. ही तीनही मुले महालच्या बाहेरील परिसरातील असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मागील मार्च महिन्यात महालात दंगल व हिंसाचार उसळला होता. त्यानंतर शिवाजी पुतळा चौकात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र काही दिवसांपासून तेथील बंदोबस्तात काहीशी शिथिलता आल्याची नागरिकांची तक्रार आहे. राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र तरीदेखील संवेदनशील भागात असा प्रकार घडल्याने पोलीस यंत्रणेवरदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.