CoronaVirus : चिंताजनक ! औरंगाबाद समुह संसर्गाच्या उंबरठ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 11:44 IST2020-04-30T11:36:41+5:302020-04-30T11:44:05+5:30
औरंगाबाद समुह संसर्गाच्या उंबरठ्यावर असुन वेळीच सावध न झाल्यास वाढत्या रुग्णांची सध्याची बेरीच गुणाकारात बदलण्यास वेळ लागणार नाही.

CoronaVirus : चिंताजनक ! औरंगाबाद समुह संसर्गाच्या उंबरठ्यावर
औरंगाबाद : शहरातील जुने हॉटस्पॉट कमी झाले. नव्या ठिकाणांची वाढ झाली. एकाच भागात विक्रमी पॉझीटीव्ह रुग्ण कोरोनाबाधित झाले. त्यामुळे औरंगाबाद समुह संसर्गाच्या उंबरठ्यावर असुन वेळीच सावध न झाल्यास वाढत्या रुग्णांची सध्याची बेरीच गुणाकारात बदलण्यास वेळ लागणार नाही. म्हणून लॉकडाऊनचे कडक पालन करा. घराबाहेर पडू नका. संपर्कात आलेल्यांची नोंद ठेवा असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देत आहे.
लॉकडाऊनच्या आधिपासून बहुतांश नागरीक वैय्यक्तीक काळजी घेत आहे. मात्र, यात सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. गेल्या महिनाभरातील उपाययोजनांचा फायदा दिसून आला वारंवार हात धुणे, न थुंकणे, गर्दी न करणे, विनाकारण बाहेर न पडणे, कायम मास्क वापरुन सामाजिक अंतर पाळणे. या उपाययोजना करत असल्याने आतापर्यंत आपण समुह संसर्गापर्यंत पोहचलो नाही. मात्र, गेल्या दोन दिवसांत काही भागांत बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे. त्यामुळे समुह संसर्गाला उंबरठा ओलांडू न देण्यासाठी प्रत्येकाने आरोग्य विभागाला सहकार्य करा. आता आणखी दक्ष राहण्याची गरज आहे. मात्र, स्वमर्जीने बंधने लादून घेवून घरातून बाहेर पडू नका असा सल्ला आरोग्य उपसंचालक व ज्येष्ठ जनऔषध वैद्यक तज्ज्ञ डॉ. स्वप्नील लाळे यांनी लोकमतला सांगितले.
सध्या आढळणारे पॉझीटीव्ह रुग्ण हे प्रथमिक व द्वितीय संपर्कातील रुग्ण आहेत. त्यामुळे याला समुह संसर्ग म्हणता येत नाही. मात्र, कोरोना जास्त पसरायला सुरुवात झाली आहे. जो पर्यंत काही भागापुरता संसर्ग मर्यादित होता. तो पर्यंत फार चिंता नव्हती. मात्र, आता प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. हे संकट नागरीकांच्या सहकार्याशिवाय थोपवता येणे शक्य नाही. मात्र, त्यासाठी प्रत्येक संशयीताने, पॉझीटीव्ह रुग्णाने त्याच्या संपर्कातील लोकांची माहीती आरोग्य यंत्रणेला खरी सांगणे अपेक्षित आहे. केरळने कॉन्टक्ट ट्रेसिंगवर भर दिला. त्यामुळे त्यांनी तेथे कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणला. शहरातही कॉन्टक्ट ट्रेसिंग सुरु आहे. मात्र, त्याला नागरीकांना उत्स्फुर्त प्रतिसाद देण्याची गरज आहे. प्लेगनंतरची सर्वात मोठी महामारी आहे. त्यामुळे त्याकडे प्रत्येक नागरिकाने गांभिर्याने पाहीले पाहीजे. असे घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी लोकमतला सांगितले.
एक रुग्ण आठ ते दहा लोकांना संसर्ग
कोरोनाचा एक रुग्ण आठ ते दहा लोकांना संसर्ग करण्याचा त्याचा परिघ (आर नॉट) जागतीक आकडेवारीवरुन दिसत आहे. त्यामुळे आतापर्यंत शहरात सापडलेले पॉझीटीव्ह रुग्ण हे संपर्कातील आहे. त्यामुळे प्रत्येक पॉझीटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील आठ ते दहा लोक आणखीअसु शकतात. त्यासाठी सपर्कातील लोकांची अचुक माहीती व त्यांची स्क्रिनींग मनपा करत आहे. त्याला प्रत्येकाने सहकार्य करणे गरजेचे असल्याचे औषधवैद्यक विभागप्रमुख डॉ. मिनाक्षी भट्टाचार्य यानी सांगितले.