बँका फोडणारी टोळी अखेर जेरबंद
By Admin | Updated: August 13, 2014 01:43 IST2014-08-13T01:36:54+5:302014-08-13T01:43:48+5:30
औरंगाबाद : राज्यभरात विशेषत: जिल्हा मध्यवर्ती बँका फोडून लाखो रुपये लुटून नेणारी कुख्यात दरोडेखोरांची एक टोळी सोमवारी रात्री औरंगाबाद पोलिसांच्या हाती लागली.

बँका फोडणारी टोळी अखेर जेरबंद
औरंगाबाद : राज्यभरात विशेषत: जिल्हा मध्यवर्ती बँका फोडून लाखो रुपये लुटून नेणारी कुख्यात दरोडेखोरांची एक टोळी सोमवारी रात्री औरंगाबाद पोलिसांच्या हाती लागली. या टोळीतील पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.
आरोपींमध्ये टोळीचा मोरक्या सुरेश काशीनाथ उमप (५०, रा. कमळापूर, मोरशी, अमरावती, सध्या सातारा परिसर, औरंगाबाद) याच्यासह विजय भास्कर शिंदे (३०, रा. पिंपरी, हवेली, पुणे), अजिंक्य पांडुरंग सपकाळ (२१, रा. नवघर रोड, भायंदर, ठाणे), श्रीकांत ऊर्फ कान्हा किसनराव उमप (२४, रा. पार्डी, मोरशी, अमरावती) व अनिल शिवसागर दुबे (४७, रा. नालासोपारा, ठाणे) यांचा समावेश आहे.
चक्क केली प्लास्टिक सर्जरी!
सुरेश उमपला त्याच्या गुन्हेगारी रेकॉर्डमुळे राज्यातील अनेक पोलीस ओळखतात. गुन्हे केल्यानंतर पकडले जाऊ नये म्हणून उमपने काही महिन्यांपूर्वी चक्क आपल्या चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी केली होती. त्यामुळे त्याचा चेहरा बदलला होता. शिवाय त्याने आपल्या केसाची ठेवणही बदलली. चेहरा बदलून तो वावरत होता, हे विशेष. लुटमारीच्या पैशांमधून उमपने नुकताच औरंगाबादेतील सातारा परिसरात एक बंगला खरेदी केला आहे. तो येथे वास्तव्य करीत होता.
जिल्हा बँकेची केली होती ‘रेकी’
सुरेश उमप व त्याच्या टोळीने औरंगाबाद जिल्हा बँकेची नुकतीच रेकी केली होती. लवकर ही बँक लुटण्याचा या आरोपींचा प्लॅन झालेला होता, असे सहायक आयुक्त अविनाश आघाव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
विशेष म्हणजे ही टोळी राज्यभरातील जिल्हा मध्यवर्ती बँकांनाच ‘टार्गेट’ करीत असे. कारण या बँकांची सुरक्षा व्यवस्था इतर बँकांच्या तुलनेत तोकडी असते, असे या आरोपींचे म्हणणे आहे, असे आघाव म्हणाले.