भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 20:40 IST2026-04-16T20:32:29+5:302026-04-16T20:40:55+5:30
Chandrapur Crime Marathi: रविकांत उर्फ रिक्की टेभूरकर (वय ४०) असे मृताचे नाव असून अनिकेत ताराचंद गलबले (वय २१) हा जखमी झाला.

भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Chandrapur Crime : डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्साह जयंतीचा शिगेला पोहोचलेला असताना गांधी चौकात घडलेल्या धक्कादायक घटनेने शहर हादरले. डीजेवर नाचताना झालेल्या धक्काबुक्कीतून वाद चिघळल्याने मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या इसमाची पाच युवकांनी मिळून चाकूने भोसकून हत्या केली. या हल्ल्यात एक युवक गंभीर जखमी झाला आहे.
रविकांत उर्फ रिक्की टेभूरकर ( वय ४०) असे मृताचे नाव असून अनिकेत ताराचंद गलबले (वय २१) हा जखमी झाला आहे. रेहान अशफाक पठाण, बादल भैसारे, चेतन सोनवणे, सुहान पठाण व शेख जीशान, सर्व रा. चंद्रपूर, अशी आरोपींची नावे आहेत.
नाचत असताना धक्का लागला आणि...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारी शहरातील विविध विहारांतून सायंकाळपासून भव्य रॅली काढण्यात आली होती. हजारो अनुयायी या रॅलीत सहभागी झाले होते. रात्री साडेअकराच्या सुमारास इंदिरा नगर येथील भीमरत्न बहुउद्देशीय युवा संस्थेची रॅली गांधी चौकात पोहोचली. यावेळी डीजेच्या तालावर नाचताना युवकांमध्ये धक्काबुक्की झाली.
रविकांतचा रस्त्यातच गेला जीव
या क्षुल्लक कारणावरून काही युवकांमध्ये वाद निर्माण झाला व त्याचे रूपांतर मारहाणीत झाले. हा वाद मिटवण्यासाठी रविकांत व अनिकेत यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त युवकांनी त्यांच्यावर चाकूने हल्ला चढवला. गंभीर जखमी अवस्थेत रविकांत यांना रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी रेहान पठाण याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलिसांच्या पथकाने तत्काळ कारवाई करत अवघ्या दोन तासांत उर्वरित चार आरोपींनाही अटक केली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१), १०९ (१), १८९ (२), १८९ (४), १९०, १९१ (२), १९१ (३), १२६ (३) ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
रॅलीत चाकू का आणला?
पोलिस तपासात बादल भैसारे हा रॅलीमध्ये चाकू घेऊन आल्याचे समोर आले असून त्याच्याकडून रेहान पठाणने चाकू घेतल्याची माहिती आहे. मात्र, रॅलीमध्ये चाकू आणण्यामागील नेमका उद्देश काय होता, याचा पोलिस सखोल तपास करत आहेत.