मुंबई-हावडा मार्गावर प्रवासी रेल्वे धावतात रिकाम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 05:00 AM2021-06-10T05:00:00+5:302021-06-10T05:00:17+5:30
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रेल्वे प्रशासनाने एक्सप्रेस गाड्यासह लोकल प्रवासी गाड्या काही काळासाठी बंद केल्या होत्या. त्यानंतर त्या पुन्हा सुरू करण्यात आल्या. एक्सप्रेस गाड्यात केवळ आरक्षित डब्यातून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली. तर दुसरीकडे पॅसेंजर रेल्वे सुरू झाल्यानंतरही प्रवाशांची संख्या मात्र वाढली नाही. अशीच स्थिती एक्सप्रेस गाड्यात दिसून येते.
लाेकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : मागील वर्षभरापासून कोरानाचा संसर्ग सुरू आहे. सर्व क्षेत्रासोबत प्रवासी रेल्वे गाड्यांनाही मोठा फटका बसला. लाकडाऊनमध्ये बंद असलेली रेल्वेसेवा सुरू झाली. मात्र दुसऱ्या लाटेचा अनुभव गाठीशी असल्याने रेल्वेकडे प्रवाशांनी पाठ फिरविल्याचे दिसत आहे. मुंबई-हावडा मार्गावर प्रवासी रेल्वे रिकाम्या धावत असून पॅसेंजर गाड्यांनाही फारसा प्रतिसाद दिसत नाही.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रेल्वे प्रशासनाने एक्सप्रेस गाड्यासह लोकल प्रवासी गाड्या काही काळासाठी बंद केल्या होत्या. त्यानंतर त्या पुन्हा सुरू करण्यात आल्या. एक्सप्रेस गाड्यात केवळ आरक्षित डब्यातून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली. तर दुसरीकडे पॅसेंजर रेल्वे सुरू झाल्यानंतरही प्रवाशांची संख्या मात्र वाढली नाही. अशीच स्थिती एक्सप्रेस गाड्यात दिसून येते.
सर्वप्रथम रेल्वे प्रशासनाने लांब अंतराच्या एक्सप्रेस गाड्या सुरू केल्या होत्या. यात आरक्षणासह प्रवास करण्याच्या आदेश दिले होते. परंतु आरक्षण डब्यातही प्रवाशांची संख्या निम्म्यावर दिसून येते. दुसऱ्या टप्प्यात रेल्वे प्रशासनाने लोकल गाड्या सुरू केल्या. परंतु यामध्येही प्रवाशांची संख्या अत्यल्प दिसून येत आहे. कोरोनाची धास्ती रेल्वे प्रवाशांनी घेतल्याचे दिसून येते.
सर्वसामान्य प्रवासी येथे चारचाकी वाहनाने प्रवास करताना दिसतात. जवळच्या प्रवासासाठी दुचाकीचा वापर वाढलेला दिसून येत आहे. बसकडेही प्रवाशांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसत आहे.
रेल्वे प्रवासादरम्यान रेल्वे प्रशासनाने प्रवासाकरिता नियम ठरवून दिले आहेत. सर्वसामान्यांना रेल्वेस्थानकावर अजूनही प्रवेशबंदी आहे. कोरोना संक्रमण काळात नागरिकांनी बाहेरगावी जाण्याचे टाळल्याचे दिसून येते.
रेल्वेस्थानकावर दिसतो शुकशुकाट
- कोरोना संसर्गाच्या पहिली लाट आली तेव्हा रेल्वे प्रवासी सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर कोरोना संसर्ग कमी होताच रेल्वे सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू झाला. मात्र, तिकीटधारक प्रवाशांनाच रेल्वेस्थानकावर प्रवेश होता. दरम्यान, दुसरी लाट आली. रेल्वेची प्रवासी वाहतूक यामुळे प्रभावित झाली. काही प्रमाणात रेल्वे सुरू असल्या तरी प्रवाशांनी मात्र पाठ फिरविल्याचे दिसून येत होते. तुमसर रेल्वे स्थानकावरून दररोज दोन ते तीन हजार प्रवासी ये-जा करीत होते. परंतु, कोरोना संसर्गापासून ही संख्या अगदी बोटावर मोजण्याइतकी झाली. त्यातच रेल्वे स्थानकावर कुणालाही प्रवेश नसल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे. रेल्वेस्थानकावर व्यवसाय करणाऱ्या व्हेंडर्सवर उपासमारीची वेळ आली आहे.