पवनी तालुक्याचे ठिकाण असल्याने ग्रामीण भागातील जनता औषधोपचार, गरजेच्या वस्तू खरेदी, बॅंक व्यवहार, भाजीपाला व अन्य विविध कामासाठी ये-जा करीत असते.
ग्रामीण भागातील नागरिक अद्यापही मास्क, सॅनिटाइजर व शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करतांना दिसत नाही. मास्क वापरलाच तर नाक आणि तोंड झाकलेले राहात नाही. तसेच कोरोना चाचणी करण्यास ग्रामीण भागातील लोक अद्यापही पाहिजे त्या प्रमाणात जागरुक नाहीत. पवनीतील अति उत्साही लोक कोरोना संदर्भात असलेल्या नियमावलीचे पालन करताना दिसत नाही.
अशा परिस्थितीत पालिका प्रशासनाने सजगता दाखवून पवनी नगराला सॅनिटाइज करणे अत्यंत आवश्यक आहे. कोरोना संसर्गाची दुसरी लाट सुरु झाल्यापासून एकदाही पवनीला पूर्णपणे सॅनिटाइज करण्यात आलेले नाही. उन्हाळ्यात डासांचा त्रास वाढलेला आहे. त्यामुळे हिवतापाचे रुग्ण वाढत आहेत. एकीकडे कोरोना रुग्ण व दुसरीकडे हिवतापाचे रुग्ण या दोन्हीला आळा घालण्यासाठी नगरात सॅनिटाइज करणे व फवारणी करणे गरजेचे असताना त्याकडे पालिका प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केलेले आहे. परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी पालिका प्रशासनाने सॅनिटाइज करणे व फवारणी करणे आवश्यक असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.