लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : रस्त्यांची वाईट अवस्था आणि अपघात प्रवण स्थळांमुळे भंडारा जिल्ह्यात गत काही वर्षात अपघाताचे प्रमाण वाढले असून गतवर्षी ३०८ अपघातात १४५ जणांचा बळी गेला. सर्वाधिक ब्लॅक स्पाॅट राष्ट्रीय महामार्गावर भंडारा, साकाेली आणि लाखनी तालुक्यात आहेत. या मार्गावरुन जाताना वाहनधारकांना जीव मुठीत घेवून जावे लागते. भंडारा शहरातून मुंबई काेलकाता राष्ट्रीय महामार्ग क्र. सहा जाताे या महामार्गावर शहापूर पासून ते साकाेलीपर्यंत अनेक ठिकाणी अपघातप्रवण स्थळे आहेत. शहापूर जवळील टी-पाॅईंट, कवडसी फाटा, फुलमाेगरा येथील पेट्राेलपंप, पलाडी फाटा, भिलेवाडा, भंडारा शहरातील नागपूर नाका, बेला, दाभा फाटा यासह जिल्ह्यात अनेक अपघात प्रवण स्थळे आहेत. याठिकाणी बांधकाम विभागाच्यावतीने सुचना फलक लावण्यात आले आहे. मात्र याकडे कुणाचेही लक्ष नसते. राष्ट्रीय महामार्गावरुन भरधाव वाहने जाताना आतील रस्त्याहून येणाऱ्या वाहनांना अपघात हाेण्याचे प्रमाण अधिक आहे. बांधकाम विभाग मात्र या अपघातप्रवण स्थळांच्या डागडुजीकडे दुर्लक्ष करते.
या ठिकाणी गाडी जपून चालवा भंडारा शहरातील नागपूर टी-पाॅईंट, साकाेली येथील बसस्थानक, चिखली फाटा, ठाणा पेट्राेलपंप, वैनगंगा नदीचा माेठा पुल याठिकाणी कायम अपघात हाेतात.