चुलीच्या धुरामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2020 06:00 AM2020-01-26T06:00:00+5:302020-01-26T06:00:00+5:30
लाखांदुर तालुक्यातील बोटावर मोजण्या इतक्या शाळांमध्ये गॅस पोहोचला आहे. त्यामुळे अन्य शाळांतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे शासनाच्या वतीने स्वयंपाक करताना घरातील धुरांपासून माहिलांची सुटका व्हावी यासाठी शासनाने उज्ज्वला गॅस योजना सुरू केली.
रविंद्र चन्नेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बारव्हा : लाखांदुर तालुक्यातील बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार म्हणून दिली जाणारी खिचडी अजुनही चुलीवरच शिजत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना धुराचा त्रास सहन करत शिक्षण घ्यावे लागत असल्याने त्यांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.
लाखांदुर तालुक्यातील बोटावर मोजण्या इतक्या शाळांमध्ये गॅस पोहोचला आहे. त्यामुळे अन्य शाळांतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे शासनाच्या वतीने स्वयंपाक करताना घरातील धुरांपासून माहिलांची सुटका व्हावी यासाठी शासनाने उज्ज्वला गॅस योजना सुरू केली. तसेच दारिर्द्य रेषेखालील तसेच गरीब कुटुंबांना मोफत घरगुती गॅसजोडणी देणे हा या योजनेचा उद्देश आहे. मात्र शाळांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून खिचडी चुलीवर शिजवली जात आहे. यावरून शासनाने सुरू केलेली ही योजना सरकारच्या शाळांमध्ये वापरली जात नसल्याचे दिसून येत आहे.
ग्रामीण भागात सरपणाच्या साहाय्याने स्वयंपाक केला जात असल्याने झाडांची मोठ्या प्रमाणात तोड केली जात होती. केंद्र शासनाने २०१६ मध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली. यात महिलांचे सक्षमीकरण आणि त्यांच्या आरोग्याची निगा राखणे स्वयंपाकासाठी लाकडी सरपण वापरल्यामुळे लहान बालके व महिलांना होणारे श्वसनाच्या तक्रारी दुर करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
परंतु तालुक्यातील शाळांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून खिचडी चुलीवर शिजत आहे. शालेय पोषण आहार तयार करण्यासाठी महिलांची नेमणूक केली जाते. त्यांना महिन्याला मानधन दिले जाते, मात्र खिचडी करताना त्यांना धुरांचा सामनाही करावा लागतो.
धुरमुक्त शाळा करण्यासाठी शासनाने गॅस सिलिंडरची व्यवस्था केली आहे. मात्र याचा लाभ तालुक्यातील बहुतांश शाळांना मिळालेला नाही. परिणामी धूरमुक्तीची कल्पना कागदावरच मिरविली जात असल्याचे दिसून येते.