जिल्ह्यात पुन्हा सहा व्यक्ती पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2020 05:00 AM2020-07-05T05:00:00+5:302020-07-05T05:00:51+5:30
भंडारा तालुक्यात मुंबई येथून आलेला ३२ वर्षीय तरुण, दिल्ली येथून आलेला ४६ वर्षीय पुरुष आणि अतिनिकट संपर्कातील १९ वर्षीय तरुणी असे तिघांचे नमुने शनिवारी पॉझिटिव्ह आले आहेत. मोहाडी तालुक्यातील ३६ वर्षीय महिला आणि दहा वर्षीय बालिकेचा कोरोनाबाधीतांमध्ये समावेश आहे. साकोली तालुक्यात गोंदिया जिल्ह्यातून आलेला ४० वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह आढळून आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून शनिवारी पुन्हा नव्या सहा रुग्णांची भर पडली आहे. भंडारा तालुक्यातील तीन, मोहाडी दोन आणि साकोली येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. कोरोनाबाधीतांची संख्या ९३ झाली असून आतापर्यंत ७७ व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत.
भंडारा तालुक्यात मुंबई येथून आलेला ३२ वर्षीय तरुण, दिल्ली येथून आलेला ४६ वर्षीय पुरुष आणि अतिनिकट संपर्कातील १९ वर्षीय तरुणी असे तिघांचे नमुने शनिवारी पॉझिटिव्ह आले आहेत. मोहाडी तालुक्यातील ३६ वर्षीय महिला आणि दहा वर्षीय बालिकेचा कोरोनाबाधीतांमध्ये समावेश आहे. साकोली तालुक्यात गोंदिया जिल्ह्यातून आलेला ४० वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह आढळून आला. जिल्ह्यात शनिवारी सहा व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आता कोरोनाबाधितांची संख्या ९३ झाली आहे. तर ७७ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. शनिवारपर्यंत जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डात ३१ व्यक्ती भरती आहेत. तर आतापर्यंत ४८५ व्यक्तींना येथून सुटी देण्यात आली. साकोली, तुमसर, लाखांदूर, पवनी, लाखनी, भंडारा आणि मोहाडी येथील कोविड केअर सेंटरमध्ये ३१९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. येथून तीन हजार ५३३ व्यक्तींना सुटी देण्यात आली आहे.
शुक्रवार ३ जुलै रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातून ७६ व्यक्तींच्या घशातील स्वॅबचे नमुने नागपुरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्या सर्व अहवालांची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातून आतापर्यंत ४ हजार ४२४ व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी पाठविले. त्यापैकी ४ हजार २५५ व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले आहेत.
भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे महानगरातून जिल्ह्यात दाखल झालेले आहेत. पुणे, मुंबईसह परप्रांतातून आलेल्या व्यक्तींचा समावेश आहे. जिल्ह्यात नऊ चेकपोस्टवर प्रत्येक वाहनांची तपासणी होत असून महानगरातून आलेल्या व्यक्तींना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येत आहे. आतापर्यंत महानगरातून ४४ हजार ३६६ व्यक्ती दाखल झाले असून त्यापैकी ४० हजार ९७२ व्यक्तींचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्यावतीने उपाययोजना केल्या जात आहे.
तीव्र श्वासदाहचे १६५ रुग्ण
जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय नागरी आरोग्य केंद्रात फ्ल्यू ओपीडी सुरु करण्यात आली आहे. तेथे आतापर्यंत तीव्र श्वासदाहचे १६५ व्यक्ती भरती करण्यात आले. त्या सर्वांचे नमुने नागपूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. १६३ नमुने निगेटिव्ह आले आहेत.