लग्नावरून परत येताना काळाने घातली झडप! नवरदेवाच्या मामा-मामीसह पाच जण ठार, वऱ्हाड्यांच्या व्हॅनचा भयंकर अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 14:07 IST2026-04-24T14:03:47+5:302026-04-24T14:07:53+5:30
Bhandara Accident News Marathi: भंडारा जिल्ह्यात लग्नावरून परतणाऱ्या पाहुण्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. यात पाच जण ठार झाले. इतर काही नातेवाईक जखमी झाले आहेत.

लग्नावरून परत येताना काळाने घातली झडप! नवरदेवाच्या मामा-मामीसह पाच जण ठार, वऱ्हाड्यांच्या व्हॅनचा भयंकर अपघात
Bhandara Accident: पवनी तालुक्यातील अड्याळ या गावालगत लग्नाचे वन्हाड घेऊन परतणाऱ्या व्हॅनला भीषण अपघात झाला. यात पाचजण ठार, तर चारजण जखमी झाले. ही घटना महामार्गावर गुरुवारी (२३ एप्रिल) रात्री ९:४५ वाजताच्या दरम्यान घडली. हा अपघात इतका भीषण होता की व्हॅनचा अक्षरशः चेंदामेंदा झाला.
श्वेता पुरुषोत्तम नगरे (वय १६, अड्याळ), प्रभाकर चाचरकर (४८, वेलतूर, जि. नागपूर) व त्यांची पत्नी मुन्नी प्रभाकर चाचरकर (४३, वेलतूर) तसेच नयना देवराम नगरे (१८), दुर्गा देवराम नगरे (४२, अड्याळ) या मायलेकींसह नवरदेवाच्या मामा-मामीचाही या अपघातमध्ये मृत्यू झाला.
जखमी चालक सोहम जागेश्वर गेडाम (२५, पिंपळगाव) आणि नवरदेवाचा मित्र उमेश बोधनलाल सोनवणे (२४, खैरलांजी, म.प्र.) यांना अड्याळच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून रक्षा खेडकर (२०, अड्याळ) आणि स्नेहा गिरीधर नान्हे (१८, अड्याळ) यांना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार, अड्याळ येथील बसस्टँड परिसरात राहणारे सुदर्शन नान्हे यांचे लग्न गुरुवारी अड्याळपासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावरील कोंढा येथील एका चर्चमध्ये होते.
बुधवारी अड्याळमध्ये आनंदात हळदीचा कार्यक्रम झाला. कोंढा येथे गोरज मुहूर्तावर असलेले लग्न आटोपल्यावर रात्री वहऱ्हाडी एका व्हॅनने (एमएच ३६/ झेड ०८६१) अड्याळला निघाले. वऱ्हाड्यांची पहिली खेप पोहोचवून दुसरी खेप आणत असतानाच अगदी गावालगतच्या सहाय्यतानगर परिसराजवळच हा अपघात घडला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हॅन आणि एका मोठ्या १० चाकी ट्रकची (सीजी ०८ / एडब्ल्यू ६६३५) समोरासमोर धडक बसल्याने हा भीषण अपघात घडला.
अपघाताच्या आवाजाने नागरिक घाबरले
अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी धाव घेऊ बचावकार्य सुरू केले. पोलिसही घटनास्थळ दाखल झाले. पोलिसांनी ट्रकचालकाला ताब्या घेतले असून चालका नाव कळू शकले नाही.
या अपघाताचे वृत्त कोंढा येथील लग्नसमारंभस्थळी पोहोचताच एकच कल्लोळ उडाला. रात्री नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी आणि पोलिस ठाण्यात गर्दी केली होती. या प्रकरणी पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून अधिक तपास केला जात आहे.