"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 19:03 IST2026-04-25T18:58:53+5:302026-04-25T19:03:44+5:30
बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानामुळे महाराष्ट्रात पुन्हा इतिहासावरुन वाद पेटला आहे.

"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Dhirendra Shastri Shivaji Maharaj Controversy: छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थ रामदासांना सत्ता सांभाळण्याची विनंती केली होती, अशा आशयाचे विधान बागेश्वर धामचे धीरेद्र कृष्ण शास्त्री यांनी केल्याने नव्या वादाला तोंड फुटले. त्यांच्या विधानानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी घणाघाती टीका केली.
आमदार अमोल मिटकरी यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. पंढरपूर वारीतील डोक्यावर विठ्ठल रुख्मिणीची मूर्ती डोक्यावर घेतलेल्या वारकरी महिलेचा फोटो आणि धीरेंद्र शास्त्रींचा फोटो त्यांनी शेअर केला आहे.
मिटकरी म्हणाले, 'भोंदू हिंदी कथाकार'
अमोल मिटकरी म्हणाले की, "नामाचे सामर्थ्य न कळे ब्रह्मादिका | वेडावली देखा वेदशास्त्रे || साधीभोळी असली महाराष्ट्रातील मराठी कीर्तनकार व वारकरी संत परंपरा या उत्तर भारतीय भोंदू हिंदी कथाकारांपेक्षा उच्च कोटीची आहे."
वारकरी संप्रदायासाठी धोक्याची घंटा
आमदार मिटकरींनी पुढे म्हटले आहे की, "एकीकडे 'पाया पडे जन एकमेका' हे तत्त्वज्ञान प्रमाण मानणारा महाराष्ट्र, तर दुसरीकडे विठ्ठलाचे नामस्मरण प्रमाण न मानणारे उत्तर भारतीय महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसविले जात असतील; तर महाराष्ट्रातील मराठी जनांच्या वारकरी सांप्रदायासाठीही धोक्याची घंटा आहे. उत्तर भारतीय भोंदू हिंदी कथाकारांवर महाराष्ट्रात बंदी घालावी", अशी मागणी करत आमदार अमोल मिटकरींनी " वारकरी वाचवा, महाराष्ट्र संत परंपरा वाचवा", असे आवाहनही केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान, धीरेंद्र शास्त्री नेमके काय बोलले?
धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल विधान केले, ज्यामुळे वादाला तोंड फुटले.
"छत्रपती शिवाजी महाराज युद्धे करून थकले. शिवाजी महाराज समर्थ रामदासांकडे गेले. आता मला जास्त लढायचे नाही व हा मुकूट आणि सत्ता तुम्ही सांभाळा, असे शिवाजी महाराज समर्थ रामदासांना म्हणाले. रामदास स्वामी त्यांना म्हणाले, ठीक आहे. मात्र शिष्याचे कर्तव्य हे गुरूच्या आदेशांचे पालन करणे हे आहे. त्यामुळे आता माझी ही सत्ता तुम्ही सांभाळावी, असे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना म्हटले होते", या धीरेंद्र शास्त्रींनी केलेल्या विधानाने महाराष्ट्रात पुन्हा एकदा इतिहासाबद्दलच्या वादाला तोंड फुटले आहे.