'फुलला मनी वसंत बहार' आजपासून वसंतोत्सवाची होतेय सुरुवात; जाणून घ्या सृष्टीत होणारे बदल!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 01:16 PM2024-03-26T13:16:35+5:302024-03-26T13:17:10+5:30

२६ मार्चपासून वसंतोत्सव सुरु होत आहे, हा ऋतू चैत्रचाहूल देणारा आणि निसर्गरम्य बदल घडवणारा आहे, त्याची किमया पाहूया...

Beginning of the spring festival from today; Know the changes in creation! | 'फुलला मनी वसंत बहार' आजपासून वसंतोत्सवाची होतेय सुरुवात; जाणून घ्या सृष्टीत होणारे बदल!

'फुलला मनी वसंत बहार' आजपासून वसंतोत्सवाची होतेय सुरुवात; जाणून घ्या सृष्टीत होणारे बदल!

वसंताचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव आहे. तो या दिवसापासून सुरू होतो. सतत सुंदर भासणारा निसर्ग वसंत ऋतूत सोळा कलांनी फुलून उठतो. यौवन हा जर आपल्या जीवनातील वसंत असेल, तर वसंत हे सृष्टीचे यौवन आहे. महर्षी वाल्मिकींनी रामायणात वसंत ऋतूचे अतिशय सुंदर व मनोहारी चित्रण केले आहे. भगवान श्रीकृष्णानेही गीतेत 'ऋतुनां कुसुमाकर:' असे म्हणून ऋतुराज वसंताची बिरुदावली गायली आहे. कविश्वर जयदेव तर वसंत ऋतूचे वर्णन करताना थकत नाहीत.

सतत आकर्षक वाटणारा निसर्ग वसंत ऋतूमध्ये लोभस बनतो. स्वत:च्या आगळ्या सौंदर्याने तो माणसाला स्वत:कडे ओढून घेतो. मात्र माणसाने त्याचे अवलोकन करण्याची फुरसत काढली पाहिजे.
  
मानवाने स्वत:च्या अस्वस्थ प्रकृतीला स्वस्थ बनवण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात गेले पाहिजे. निसर्गात एक असा अजब जादू आहे की, जो मानवाला त्याच्या सर्व वेदनांचे तत्काळ पुरेसे विस्मरण करवतो. जर या निसर्गाचे सान्निध्य सतत राहिले तर त्याचा मानव जीवनावर फारच खोल प्रभाव पडतो.

निसर्गात अहंशून्यता असते आणि म्हणूनच तो प्रभूच्या अधिक जवळ आहे. याच कारणामुळे निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यावर आपण प्रभूच्या अधिक जवळ गेलो आहोत असा अनुभव येतो. 

निसर्ग सुख दु:खाच्या द्वंद्वापासून दूर आहे. वसंत असो अथवा वर्षा! वेगवेगळ्या रूपात प्रभूचा हात सृष्टीवर फिरत असतो आणि समग्र निसर्ग प्रभूस्पर्श प्राप्त करून पुâलून उठतो. जीवनातही जर प्रभूचा स्पर्श झाला, प्रभूचा हात फिरला तर संपूर्ण जीवनच बदलून जाईल. जीवनात वसंत फुलून उठेल. जीवनातून दु:ख, दैन्य, दारिद्रय क्षणभरात दूर होईल.

प्रभुस्पर्शी जीवनात नेहमी एकच ऋतु असतो आणि तो म्हणजे वसंत! त्याच्या जीवनात एकच अवस्था कायम राहते आणि ती म्हणजे यौवन! परंतु निसर्गाची सुंदरता व मानवाची रसिकता यांच्यात जर प्रभूचा सूर मिळाल नाही तर ही सुंदरता व रसिकता विलासाचा मृृदुल पंथ निर्माण करून मानवाला विनाशाच्या गर्तेतदेखील ढकलून देईल. म्हणून वसंताच्या संगीतात गीतेचा सूर मिसळला पाहिजे.

वसंताचा उत्सव हे अमर आशावादाचे प्रतीक आहे. वसंताचा खरा पुजारी जीवनात कधी निराश बनत नाही. शिशिर ऋतूत वृक्षाची पाने गळून पडतात, पण तो स्वत:च्या जीवनातून निराशा झटकून टाकतो.

वसंत म्हणजे आशा व सिद्धी यांचा सुंदर संगम. कल्पना व वास्तवता यांचा सुगम समन्वय. खNया महापुरुषाच्या जीवनात आशेला सिद्धीमध्ये बदलवणाऱ्या साधनांचे फारच महत्त्व असते. तो केवळ कल्पनात रमणारा स्वप्नशील असत नाही. तसाच रोजच्या वास्तविक जीवनापासून जरादेखी वर पाहू नये इतका जडही असत नाही. जीवन व वसंत ज्याने एकरूप करून टाकले अशा मानवाला आपली संस्कृती संत म्हणते. ज्याच्या जीवनात वसंत फुलतो, तो संत!

यौवन आणि संयम, आशा आणि सिद्धी, कल्पना आणि वास्तव, जीवन आणि कवन, भक्ती व शक्ती, सर्जन व विसर्जन या सर्वांचा समन्वय साधणारा तसेच जीवनात सौंदर्य, संगीत व स्नेह प्रकट करणारा वसंत आपल्या जीवनात साकार बनला तरच आपण बसंताच्या वैभवाला जाणले, अनुभवले व पचवले असे म्हणता येईल. 

Web Title: Beginning of the spring festival from today; Know the changes in creation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Natureनिसर्ग