इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 14:18 IST2026-04-23T14:17:11+5:302026-04-23T14:18:40+5:30
EV vs Petrol Car Decision: इराण युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ आणि केंद्राचे ८५% इथेनॉल मिश्रणाचे धोरण यामुळे वाहन बाजारपेठेत खळबळ उडाली आहे. अशा परिस्थितीत इलेक्ट्रिक कार (EV) खरेदी करणे तुमच्यासाठी किती फायदेशीर ठरेल? सविस्तर विश्लेषण.

इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
कोरोना काळात जशा वेगाने पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढल्या तशा वेगाने इलेक्ट्रीक गाड्यांची देखील क्रेझ वाढत गेली. दिल्लीने प्रदुषणामुळे इलेक्ट्रीक गाड्यांसाठी सबसिडी आणली आणि नंतर केंद्रासह इतर राज्यांनी देखील सबसिडी सुरु केली. आता पुन्हा इराण युद्धामुळे आणि इथेनॉलमुळे इलेक्ट्रीक गाड्यांची मागणी वाढू लागली आहे. यामुळे येत्या काळात इलेक्ट्रीक गाडी घ्यावी की पेट्रोल, डिझेल, सीएनजी असा प्रश्न अनेकांसमोर उभा ठाकला आहे.
साधारण पाच वर्षांपूर्वीचा इलेक्ट्रीक गाड्यांचा विचार केला तर आता त्याच्या तुलनेत चार्जिंग पॉईटची संख्या कमालीची वाढली आहे. भविष्यात ती वाढत जाणार आहे. वाहन निर्मात्या कंपन्यांपेक्षा इतर कंपन्यांनीच यात आघाडी घेतली आहे. यामुळे मुंबई, पुण्याच्या बाहेर जाताना तुम्हाला हमखास दर ३०-४० किमीवर इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन दिसू लागले आहेत. ही संख्या वाढायला हवी कारण इलेक्ट्रीक गाड्यांना चार्ज व्हायला साधारण तासभर वेळ लागतो. जर मागून दुसरा आला तर त्याला पहिल्या गाडीचे होईस्तोवर वेटिंग करावे लागते. असे असले तरी अशी वेळ खूप कमी वेळा येत आहे. याचे कारण म्हणजे घरी करता येणारे चार्जिंग. बहुतांश गाड्या या घरीच चार्ज केल्या जातात. लांबच्या रनिंगला फक्त बाहेर चार्जिंग पॉईंटवर गाड्या चार्ज कराव्या लागतात.
इथेनॉल (E-85) आणि सध्याची पेट्रोल वाहने
दोन दिवसांपूर्वी केंद्रीय नेते नितीन गडकरी यांनी इथेनॉल पेट्रोल मिक्सिंग २० टक्क्यावरून हळूहळू ८५ टक्क्यांवर नेण्याची घोषणा केली आहे. हे अगदी उद्याच होणार नसले तरीही येत्या काही वर्षांत होणार आहे. मध्य पूर्वेतील युद्धामुळे होर्मुझची सामुद्रधुनी हा मुख्य तेल वाहतूक मार्ग विस्कळीत झाला आहे. यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत १०-१३% वाढ झाली असून पुरवठा साखळीवर ताण आला आहे. भारतात निवडणूक असल्याने कंपन्यांनी ३०-४० रुपयांचे नुकसान सोसून अद्याप दर वाढविलेले नाहीत. परंतू, हे दर वाढविण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अशावेळी नवीन कार घेणाऱ्या ग्राहकांकडे इलेक्ट्रीक कार, दुचाकींचा पर्याय उरत आहे.
सध्या जी पेट्रोल वाहने लोकांनी घेतलेली आहेत किंवा विकली जात आहेत ती काही ८५ टक्के इथेनॉलवर चालू शकणार नाहीत. कारण त्यांचे इंजिन पूर्णपणे सामान्य पेट्रोल किंवा २० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोलसाठी बनविलेले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर इथेनॉलवर काम करण्यासाठी या लोकांना नवीनच गाड्या घ्याव्या लागणार आहेत. म्हणजे गाड्यांचा दुरुस्तीचा खर्च वाढणार आहे. यामुळे अनेक ग्राहकांसमोर इलेक्ट्रीक गाड्यांचाच पर्याय उरणार आहे.
कोणासाठी इलेक्ट्रीक कार फायद्याची...
जर तुमचा दररोजचा प्रवास जास्त असेल तर EV हा दीर्घकाळासाठी सर्वोत्तम आर्थिक पर्याय आहे. जरी खरेदी किंमत जास्त असली, तरी ५ वर्षात इंधनावरील बचतीतून ती वसूल होते. ही वाहने चालविण्याचा खर्च हा पेट्रोल वाहनापेक्षा खूपच कमी म्हणजे दरकिमीला १ रुपया एवढा आहे. शिवाय शून्य थेट उत्सर्जनामुळे तुमच्या भागातील प्रदुषणावरही आळा बसतो. सध्या कंपन्यांनी इलेक्ट्रीक कारवरील वॉरंटी वाढविली आहे. यामुळे बॅटरीचा नादुरुस्तीचा फटका देखील कमी बसणार आहे.