बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 15:37 IST2026-04-23T15:36:07+5:302026-04-23T15:37:11+5:30
आसनसोलमध्ये संतप्त जमावाने भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या कारच्या काचा फुटल्या आहेत.

बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानादरम्यान हिंसाचाराच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीत. मुर्शिदाबाद आणि दक्षिण दिनाजपूरनंतर आता आसनसोलमधून हिंसाचाराची घटना समोर आली आहे. आसनसोलमध्ये संतप्त जमावाने भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या कारच्या काचा फुटल्या आहेत.
अग्निमित्रा पॉल या आसनसोल दक्षिण विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या कारवर विटा आणि दगड फेकण्यात आले, ज्यामुळे गाडीच्या खिडक्यांचं नुकसान झालं. या घटनेनंतर तपासासाठी तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला असून, त्यामध्ये भाजपा उमेदवार आपल्या कारसमोर उभ्या असलेल्या दिसत आहेत.
Asansol, West Bengal: In Asansol South assembly constituency, BJP candidate Agnimitra Paul’s car was reportedly attacked, with bricks and stones thrown, breaking its windows. The incident was later reported to the police for investigation. pic.twitter.com/hZD7zFFwk2
— IANS (@ians_india) April 23, 2026
अग्निमित्रा पॉल यांनी फॅशन डिझायनर म्हणून कारकीर्द गाजवल्यानंतर राजकारणात एन्ट्री केली आहे. त्या पश्चिम बंगाल भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा आहेत. गेल्या निवडणुकीतही त्यांनी आसनसोल दक्षिण मतदारसंघातून विजय मिळवला होता आणि या वेळीही त्या पुन्हा रिंगणात आहेत. मात्र मतदानादरम्यानच त्यांच्यावर हा हल्ला झाला.
गुरुवारी पहिल्या टप्प्यातील मतदानावेळी मुर्शिदाबाद आणि दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यातही हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. मुर्शिदाबादमध्ये तृणमूल काँग्रेस (TMC) समर्थकांची हुमायूं कबीर यांच्याशी वाद झाला, तर दक्षिण दिनाजपूरमध्ये जमावाने भाजपा उमेदवार शुभेंदु सरकार यांच्यावर हल्ला केला. निवडणूक आयोगाने या सर्व हिंसक घटनांची दखल घेतली असून संबंधित विभागांकडून सविस्तर अहवाल मागवला आहे.