चुकीची वक्तव्ये करून समाजात तेढ निर्माण करू नका : बावनकुळेंची राणा, बोंडेंना तंबी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 14:43 IST2026-04-19T14:42:36+5:302026-04-19T14:43:31+5:30
Amravati : परतवाडा येथील खळबळजनक 'व्हिडीओ कांड' प्रकरणावरून सध्या अमरावती जिल्ह्याचे राजकीय वातावरण तापले असतानाच, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला.

Don't create division in the society by making wrong statements: Rana of Bawankule, Tambi of Bonde
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : परतवाडा येथील खळबळजनक 'व्हिडीओ कांड' प्रकरणावरून सध्या अमरावती जिल्ह्याचे राजकीय वातावरण तापले असतानाच, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला. पुरावे असतील तर पोलिसांना द्या; पण मीडियासमोर बोलून समाजात तेढ निर्माण करू नका, अशा शब्दांत बावनकुळे यांनी माजी खासदार नवनीत राणा, खासदार डॉ. अनिल बोंडे आणि राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान या तिघांचीही जाहीर कानटोचणी केली. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणावर रान उठवणारे भाजप खासदार डॉ. अनिल बोंडे पालकमंत्र्यांच्या या दौऱ्यात कुठेही दिसले नाहीत, ही चर्चेची बाब ठरली.
परतवाडा प्रकरणात १८ व्हिडीओ आणि ८ पीडिता निष्पन्न झाले असताना, खा. अनिल बोंडे यांनी १८० मुली आणि ३५० व्हिडीओंचा दावा केला होता. बावनकुळे यांनी या दाव्यातील हवाच काढून टाकली. जोपर्यंत पोलिसांकडून अधिकृत माहिती येत नाही, तोपर्यंत लोकप्रतिनिधींनी आकड्यांची फेकाफेकी करू नये. यामुळे समाजात धार्मिक तेढ निर्माण होते आणि मुख्य म्हणजे पीडित मुली पुढे येण्यास घाबरतात, असे बावनकुळे यांनी ठणकावून सांगितले. पालकमंत्र्यांनी शनिवारी दुपारी पोलिस अधीक्षक कार्यालयात जाऊन तपासाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आ. प्रवीण तायडेदेखील उपस्थित होते.
काय म्हणाले बावनकुळे?
राणा, बोंडे किंवा प्यारे खान, कुणाकडेही पुरावे असतील तर त्यांनी ते तत्काळ एसआयटीकडे सोपवावेत. माध्यमांनी सोशल मीडिया किंवा नेत्यांची विधाने नव्हे, तर पोलिसांनी दिलेली माहितीच अधिकृत मानावी, असे आवाहनदेखील बावनकुळे यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच आयींकडून याप्रकरणाचा आढावा घेतला असून, आरोपी देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याला शोधून काढू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
'कोणत्याही लोकप्रतिनिधीने पोलिसांचा किंवा एसआयटीचा तपास भरकटवण्याचा प्रयत्न करू नये. माध्यमांनीही संवेदनशीलतेने वार्तांकन करावे. हा तपास योग्य दिशेने सुरू असून, ग्रामीण पोलिस कौतुकास पात्र आहेत. त्यांनी सुमोटो कारवाई केली, असेही बावनकुळे म्हणाले.
बयाण आणि फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा
नागपूरहून एक १५ वर्षीय पीडिता बयान देण्यासाठी आली असून, पोलिस अत्यंत सतर्कतेने तपास करत आहेत. अमरावती ग्रामीण पोलिसांनी व्हायरल व्हिडीओ रोखून परिस्थिती नियंत्रणात आणल्याबद्दल बावनकुळे यांनी एसपी विशाल आनंद यांचे कौतुक केले.
आता सर्वांचे लक्ष फॉरेन्सिक अहवालाकडे लागले असून, त्यानंतरच दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.