अहमदनगर : ग्रामीण विकासामध्ये स्वच्छता हा कुटुंबाचा व गावाचा आत्मा आहे. गावातील प्रत्येक नागरिकाने आपले गाव व कुटुंब स्वच्छ ठेवणे कर्तव्ये व जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येकाने गाव स्वच्छ ठेवून गावाचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी शौचालय उभारुन नियमितपणे त्याचा वापर करावा, असे आवाहन नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी शीलकुमार जगताप यांनी केले.
ग्रामीण स्वच्छतेस प्रोत्साहन देऊन लोकांचा स्वच्छ भारत अभियानात सहभाग वाढवून हे अभियान यशस्वी करणे व गावाचे आरोग्य सुरक्षित करण्याच्या उद्देशाने नॅशनल बँक फॉर अॅग्रीकल्चर अॅण्ड रुरल डेव्हलपमेंट (नाबार्ड) व बॉस्को ग्रामीण विकास केंद्र केडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नगर तालुक्यातील आगडगाव व रांजणी येथे एक दिवसीय ग्रामीण स्वच्छता जनजागृती अभियान कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी जगताप बोलत होते. या कार्यशाळेत जिल्हा अग्रणी बँकेचे जिल्हा प्रबंधक संदीप वालावलकर, प्राथमिक आरोग्य केंद्र देवगावचे डॉ. मोरे, आत्माचे डोईफोडे व बॉस्को ग्रामीण विकास केंद्राचे संचालक फादर जॉर्ज डीअॅब्रिओ यांनी ग्रामस्थांना स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत गावातील प्राधान्यक्रमे निवडलेल्या १३५ वंचित कुटुंबांनी सहभाग घेतला.
या कार्यशाळेसाठी आगडगावचे सरपंच मच्छिंद्र कराळे, उपसरपंच किसन शिरसाठ, रांजणीचे सरपंच बाळासाहेब चेमटे, उपसरपंच विजय लिपने, रांजणी सोसायटीचे उपाध्यक्ष अशोक लिपने आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन बॉस्को ग्रामीण विकास केंद्राचे दिनेश शेरकर यांनी केले.
............
२५ साजिद शेख
ग्रामीण स्वच्छता जनजागृती अभियान कार्यशाळेत बोलताना नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी शीलकुमार जगताप. समवेत संदीप वालावलकर, डॉ. मोरे, फादर जॉर्ज डीअॅब्रिओ आदी.