ऐकेकाळी दूरसंचार खात्याचे तारेद्वारे संदेशवहन होत असे. त्यामुळे दूरसंचार खात्याने जागोजागी विद्युत मंडळासारखे खांब उभारून शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही दूरसंचारचे मोठे जाळे निर्माण केले होते. खांबावरील एखादी तार तुटली, तर दूरसंचार यंत्रणा विस्कळीत होत असे. यंत्रणा विस्कळीत झाल्यानंतर दूरध्वनीचे कर्मचारी दुरुस्ती करीत असत. अशा पद्धतीने दूरध्वनी खात्याने कोट्यवधी रुपयांची यंत्रणा निर्माण केली होती. कालातंराने व्हॉटस्ॲप, इन्स्टाग्राम, फेसबुक मेसेंजर, ट्विटर, टेलिग्राम, स्नॅपचॅटश, अशा नवीन यंत्रणा विकसित झाल्या. त्याप्रमाणे दूरध्वनी खात्यातही बदल केले. पर्यायाने खांबांवरील तारांद्वारे संदेशवहन बंद होऊन त्याची जागा ऑप्टिकल केबलने घेतली. दूरध्वनी खात्याने जागोजागी अंडरग्राउंड केबल टाकल्या. या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे जुन्या पद्धतीची असलेली खांबावरील तारेची संदेशवहन यंत्रणा बंद पडली. हे खांब काही ठिकाणी पडलेल्या अवस्थेत आहेत. काही ठिकाणी तारा मोठ्या प्रमाणात लोंबलेल्या स्थितीत आहेत.
.................
अनेक ठिकाणी चोरी
बदलत्या काळाच्या ओघात दूरसंचार खात्याला हे जुने खांब व तारा गोळा करण्यासही वेळ मिळाला नाही. या यंत्रणेचे सर्व साहित्य गोळा करून भंगारात विकले तरीही यातून दूरसंचार खात्याला कोट्यवधी रुपयांचा फायदा होऊ शकेल. जुने खांब गोळा करून ते शेतकऱ्याला किंवा गरज पडेल, त्यांना अल्प किमतीत विकले तरी त्यातून चांगले उत्पन्न होण्यास मदत होणार आहे; परंतु अजूनही जुन्या पद्धतीच्या दूरध्वनी यंत्रणेचे अवशेष मोठ्या प्रमाणात जागोजागी पाहावयास मिळत आहेत. काही ठिकाणी हे खांब व तारांची मोठ्या प्रमाणात चोऱ्यादेखील होत आहेत.
.........................
भूमिगत केबलमुळे दूरध्वनीचे खांब निकामी झालेले आहेत. ही वस्तुस्थिती आहे. शिर्डी, कोपरगाव या भागातील आणि रस्त्यावरील दूरध्वनीचे खांब दूरसंचार विभागाने यापूर्वी काढलेले आहे. अद्यापही अनेक ठिकाणी खांब उभे आहेत. ते काढणेबाबत दूरसंचार विभाग विचाराधीन असून, यासंदर्भातील प्रक्रिया सुरू आहे.
-कैलास पायमोडे, उपमंडल अभियंता, दूरसंचार विभाग, शिर्डी