खेड्यापाड्यात आंतरराष्ट्रीय शिक्षणाची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 05:00 AM2020-10-05T05:00:00+5:302020-10-05T05:00:34+5:30
झरी जामणी, वणी, मारेगाव, पांढरकवडा, दारव्हा, दिग्रस अशा विविध तालुक्यातील शिक्षकांनी एकत्र येत ‘भविष्यवेधी कार्यशाळे’चा उपक्रम सुरू केला आहे. त्याच्या समन्वयाची जबाबदारी घेतली झरीचे गटशिक्षणाधिकारी प्रकाश नगराळे यांनी. शाळा बंद असल्याने शिक्षकांकडे भरपूर मोकळा वेळ आहे, त्या वेळेचा सदुपयोग करीत शिक्षकांना अधिक अद्ययावत अध्यापनाचे तंत्र शिकता यावे, यासाठी ही कार्यशाळा सुरू करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोनामुळे शाळा बंद असल्याने एकीकडे शिक्षणाबाबत चिंता व्यक्त होत असताना जिल्ह्याच्या खेड्यापाड्यातील शिक्षक मात्र थेट आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाची सज्जता करीत आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या जागतिक स्तरावरील ‘पीसा’ परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना नेमके काय आणि कसे शिकवावे, याची तयारी केली जात आहे. अन् त्यांना मार्गदर्शन लाभतेय माजी शिक्षण सचिव व विद्यमान रोहयो विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांचे!
झरी जामणी, वणी, मारेगाव, पांढरकवडा, दारव्हा, दिग्रस अशा विविध तालुक्यातील शिक्षकांनी एकत्र येत ‘भविष्यवेधी कार्यशाळे’चा उपक्रम सुरू केला आहे. त्याच्या समन्वयाची जबाबदारी घेतली झरीचे गटशिक्षणाधिकारी प्रकाश नगराळे यांनी. शाळा बंद असल्याने शिक्षकांकडे भरपूर मोकळा वेळ आहे, त्या वेळेचा सदुपयोग करीत शिक्षकांना अधिक अद्ययावत अध्यापनाचे तंत्र शिकता यावे, यासाठी ही कार्यशाळा सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थी हुशार असले, तरी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणात ते तरबेज व्हावे, पुढील वर्षी पीसा परीक्षेत बाजी मारून त्यांनी देशाचे नाव उंचवावे, यासाठी तयारी केली जात आहे. विविध गावातील शिक्षक दररोज दुपारी ४ ते सायंकाळी ६ असे एकत्र येऊन हा उपक्रम राबवित आहेत. विशेष म्हणजे, खेड्यापाड्यातील या उपक्रमशील शिक्षकांना तत्कालीन शिक्षण सचिव नंदकुमार, शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
‘पिसा’ म्हणजे नेमके काय ?
जगभरातील कोणत्या देशाची शिक्षण व्यवस्था सध्या उत्तम आहे, याचा आढावा घेण्याच्या दृष्टीने ‘ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट’ ही संस्था पीसा (प्रोग्राम फॉर इंटरनॅशनल स्टुडेंट असेसमेंट) मूल्यांकन चाचणी घेत असते. त्यात जवळपास ८० देश भाग घेतात. दर तीन वर्षांतून होणाºया या परीक्षेत महाराष्ट्राने एकदाही भाग घेतला नाही. मात्र २०२१ मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सहभागी करण्याची तयारी तत्कालीन शिक्षण सचिव नंदकुमार यांनी सुरू केली होती. ती आता अधिक वेगाने सुरू आहे.
आंतरराष्ट्रीय शिक्षणाची उद्गाता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाबळेवाडी शाळेचे शिक्षक दत्तात्रय वारे अनुभव कथन करतात. शिवाय, प्रत्येक शिक्षकाला रोज स्वाध्याय दिला जातो, रोज त्यांना अहवाल वाचन करावा लागतो. त्यामुळे अध्यापनशैली अधिक विद्यार्थीभिमुख होण्याकडे वाटचाल सुरू आहे.
- प्रकाश नगराळे
गटशिक्षणाधिकारी, झरीजामणी