नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 15:41 IST2026-04-22T15:26:19+5:302026-04-22T15:41:35+5:30
पंतप्रधान बालेन शाह यांनी नियुक्तीच्या दिवशीच मंत्रिमंडळ स्थापन केले, गुरुंग यांची गृहमंत्री म्हणून नियुक्ती केली होती. सुरुवातीला उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना अटक करून प्रसिद्धी मिळवलेले गुरुंग, मागील काही दिवसांपासून टीकेचे लक्ष्य बनले आहेत.

नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
नेपाळमध्ये पंतप्रधान बालेन शाह यांच्या सरकारविरोधात वाढत्या जनक्षोभाच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री सुदान गुरुंग यांनी राजीनामा दिला आहे. गुरुंग यांच्यावर बेहिशेबी मालमत्तेपासून ते मनी लाँड्रिंगपर्यंत अनेक आरोप आहेत. एका वादग्रस्त उद्योगपतीशी संबंधित कंपन्यांमध्ये शेअर्स खरेदी केल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे. गुरुंग यांनी पंतप्रधान बालेन शाह यांच्याकडे आपला राजीनामा दिला आहे. त्यांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या राजीनामा दिल्याची माहिती दिली.
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
सुदान गुरुंग यांनी पोस्ट केले, "मी गृहमंत्री म्हणून प्रामाणिकपणे सेवा बजावत आलो आहे. माझ्या शेअर्स आणि इतर मुद्द्यांविषयी अलीकडे उपस्थित केलेले प्रश्न, टिप्पण्या आणि जनतेने व्यक्त केलेल्या चिंता मी गांभीर्याने घेतल्या आहेत. माझ्यासाठी पदापेक्षा नैतिकता अधिक महत्त्वाची आहे आणि जनतेच्या विश्वासापेक्षा मोठी कोणतीही शक्ती नाही. आज देशात उदयास येत असलेली, सुशासन, पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाची मागणी करणारी 'जेन झी' चळवळदेखील तोच संदेश देत आहे. सार्वजनिक जीवन स्वच्छ असले पाहिजे आणि नेतृत्व प्रतिसाद देणारे असले पाहिजे.
सुदान गुरुंग म्हणाले की, माझ्या ४६ बंधू-भगिनींच्या रक्ताने आणि बलिदानाने स्थापन झालेल्या सरकारवर जर कोणी प्रश्न उपस्थित केले, तर त्याचे उत्तर नैतिक असले पाहिजे. त्यामुळे, माझ्याशी संबंधित प्रकरणांची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे आणि मी पदावर असताना कोणताही हितसंबंधांचा संघर्ष होता कामा नये. याचा तपासावर परिणाम होता कामा नये. याच उद्देशाने, मी आजपासून गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. मी माझी नैतिक जबाबदारी पार पाडली आहे. आता, माझी माझ्या पत्रकार मित्रांना, सामान्य नेपाळी बंधू-भगिनींना आणि तरुणांना विनंती आहे की, जर आपल्याला खरोखरच बदल हवा असेल, तर आपण सत्य, प्रामाणिकपणा आणि आत्मशुद्धीच्या मार्गावर उभे राहिले पाहिजे. काही माध्यमकर्मींचे 'आदर्श' असलेले मुद्देही हळूहळू उघड होतील. ज्यांना रामराज्याची आकांक्षा आहे, त्यांनी त्याग आणि नैतिक धैर्यही दाखवले पाहिजे. मी माझ्या देशासाठी, आपल्या सुरक्षा दलांच्या सन्मानासाठी आणि नेपाळच्या तरुणांसाठी राजीनामा देत आहे.