समन्स, वॉरंट, नोटीस आता पाठविणार ऑनलाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 05:00 AM2020-06-26T05:00:00+5:302020-06-26T05:00:02+5:30
राज्यात कोरोनाची बाधा झाल्याने त्याचा मोठा फटका पोलीस दलास बसला आहे. त्यात अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांचा बळी गेला आहे. पोलीस कर्मचाºयांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलीस महासंचालक कार्यालयाने सर्वोतपरी उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून वॉरंट आणि समन्स ऑनलाईन बजावण्यात येणार आहे. यापूर्वी समन्स आणि वॉरंट हे प्रत्यक्ष घरी जाऊन तामिल करण्यात येत होते.
चैतन्य जोशी।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोना महामारीचा वाढता संसर्ग लक्षात घेता आता पोलीस प्रशासन यापुढे हायटेक प्रणालीचा वापर करणार असून आरोपी, फिर्यादी आणि साक्षीदारांना बजावण्यात येणारे वॉरंट, नोटीस यापुढे व्हॉट्सअॅप आणि ई-मेलवर पाठविण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे दोन्ही साधन नाहीत अशांनाच पोस्ट किंवा कुरिअरने वॉरंट आणि नोटीस तामिल केले जातील असा आदेश पोलीस महासंचालक कार्यालयाने पारित केल्याची माहिती आहे.
राज्यात कोरोना विषाणू संक्रमण बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे यापुढे न्यायालयाकडून येणारे समन्स, वरिष्ठांकडून बजावण्यात येणाऱ्या नोटीस संबंधी सर्व दस्तऐवज हे यापुढे ऑनलाईन पाठविण्यात यावे, त्यासाठी व्हॉट्सअॅप, ईमेल आदी सोशल साईट्सचा वापर करावा. ज्या ठिकाणी ऑनलाईन वापर अशक्य आहे अशाच ठिकाणी पोस्टाचा वापर करण्यात यावा, यापुढे आरोपी, फिर्यादी, साक्षीदार आणि पंच यांचे मोबाईल नंबर तसेच ईमेल नोंदविणे आवश्यक राहणार असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
राज्यात कोरोनाची बाधा झाल्याने त्याचा मोठा फटका पोलीस दलास बसला आहे. त्यात अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांचा बळी गेला आहे.
पोलीस कर्मचाºयांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलीस महासंचालक कार्यालयाने सर्वोतपरी उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून वॉरंट आणि समन्स ऑनलाईन बजावण्यात येणार आहे. यापूर्वी समन्स आणि वॉरंट हे प्रत्यक्ष घरी जाऊन तामिल करण्यात येत होते. पण, यापुढे ते ऑनलाईन पाठविण्यात येणार असल्याने कोरोनामुळे का होईना, पोलीस विभाग हायटेक प्रणालीकडे वळत असल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे तसेच संपूर्ण कामकाज पेपरलेस करुन ऑनलाईन करण्याकडे पोलीस विभागाची वाटचाल सुरू आहे. याबाबतचे आदेश कायदा व सुव्यवस्था विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांनी तसे आदेश पारित केले असल्याची विश्वसनीय माहिती आहे.
अंमलबजावणीची शक्यता कमीच
पोलीस विभागाने ऑनलाईन प्रणालीवर भर दिला असला तरी बहुतांश् ठिकाणचे कर्मचारी वॉरंट आणि नोटीस तामिल करण्यासाठी कर्मचारी संबंधितांची भेट घेणेच ‘फायदेशीर’ मानतात. वॉरट घेण्याची अनेकांची इच्छा नसल्यास ते वॉरंट तामिल करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांशी ‘अर्थ’पूर्ण संवाद साधून त्याला स्वल्पविराम किंवा पूर्णविराम देतात. त्यामुळे अनेक कर्मचारी हे वॉरंट ऑनलाईन पाठविण्याच्या भानगडीत पडणार नसल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
पोलिसांची यादी अपडेट करणे सुरू
जिल्ह्यातील सुमारे १७०० कर्मचारी आणि अंदाजे १०० अधिकाऱ्यांच्या नावाची यादी संगणकात अद्यायावत करण्याचे काम सुरू आहे.
ज्या कर्मचाऱ्यास मेसेज किंवा सूचना पत्र पाठवायचे असल्यास ते एका क्लिकवर पाठविण्यात येणार अशी हायटेक प्रणाली तयार करण्याचे काम सुरू आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयात एक अधिकारी आणि १२ कर्मचाऱ्यांकडून दिवसरात्र कामकाज करण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक आणि गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनात १ अधिकारी आणि १२ कर्मचाऱ्यांकडून काम सुरू आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईन्स नुसार न्यायालयातून मिळाले समन्स, वॉरंट हे साक्षीदारांना, आरोपींना व्हॉट्सअॅप, ई-मेल करून पाठविण्यात येणार आहे. त्यांनी ते रिड केले तर त्यांना समन्स तामिल झाला असे ग्राह्य समजल्या जाणार आहे. ऑनलाईन प्रणालीचे काम सुरू आहे.
- नीलेश ब्राह्मणे, पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा.