"इंधन बचतीसाठी ताफ्यातील तीन वाहनं कमी"; प्रताप सरनाईक यांनी मंत्र्यांना दिला सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 13:21 IST2026-05-13T13:20:08+5:302026-05-13T13:21:02+5:30
Pratap Sarnaik : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपण स्वत: वाहन ताफ्यात कपात केल्याची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

"इंधन बचतीसाठी ताफ्यातील तीन वाहनं कमी"; प्रताप सरनाईक यांनी मंत्र्यांना दिला सल्ला
ठाणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपण स्वत: वाहन ताफ्यात कपात केल्याची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. स्वत:च्या ताफ्यातील तीन गाड्या कमी केल्या आहेत. आवश्यक तेवढ्याच वाहनांचा वापर सुरू ठेवला आहे. सर्व मंत्र्यांनीही ताफा मर्यादित ठेवण्याची गरज आहे असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
ओवळा-माजीवाडा परिसरात विहिरींच्या पुनर्जीवनाचे काम वेगाने सुरू असून दर आठवड्याला तीन विहिरींचे लोकार्पण करण्याचा मानस असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. बुधवारी देखील त्यांच्या हस्ते माजिवडा, नळपाडा कापुरबावडी आदी भागातील विहिरांच्या पुनरुज्जीवन प्रकल्पांचा लोकापर्ण सोहळा त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. टेस्ला वाहन वापरावरून झालेल्या टीकेवर उत्तर देताना त्यांनी पर्यावरणपूरक वाहतुकीचा पुरस्कार केला.
इलेक्ट्रिक वाहन वापरल्यामुळे मला ट्रोल करण्यात आले. मात्र पर्यावरण संवर्धनासाठी अशा वाहनांचा वापर आवश्यक आहे. अनेक मंत्र्यांनी विदेशी दौरेही रद्द केले आहेत असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक पर्यावरणपूरक करण्यासाठी २० हजार इलेक्ट्रिक बसेस सुरू करण्याचा निर्धार असल्याचे त्यांनी जाहीर केले. पीपीपी तत्त्वावर राज्यभर चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम सुरू आहे. एसटी महामंडळासाठी छावा नावाचे स्वतंत्र ॲपही आणले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
खासदार अमोल कोल्हे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, विरोधकांनी विरोधकांचे काम करावे. मात्र पंतप्रधान मोदी देशाला पुढे नेत आहेत, हे मान्य करावे लागेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार महाराष्ट्राला पुढे नेण्याचे काम करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी (शरद पवार) चे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या आंदोलनावरही त्यांनी उपरोधिक टीका केली. त्यांच्या वजनामुळे घोडा पळाला हे महत्त्वाचे आहे. त्यांना घोड्यावर जाताना पाहून घोड्याची दया येत होती, असा टोला त्यांनी लगावला. एका दिवसापुरते आंदोलन करण्यापेक्षा रोजच्या जीवनात पर्यावरणपूरक प्रवास केला तर त्याचा अधिक चांगला संदेश जाईल, असेही ते म्हणाले. अजित पवार यांच्या पक्षातील घडामोडींवर बोलण्यास त्यांनी नकार दिला. तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
आमदार रोहित पवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सरनाईक म्हणाले, राज्यात अनेक भोंदू बाबा आणि भविष्य सांगणाऱ्यांवर कारवाई झाली आहे. आता रोहित पवार भविष्य सांगण्याची जबाबदारी घेत असतील तर आम्हीही आमच्या भविष्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांच्याकडे जाऊ असा उपरोधीक टोलाही त्यांनी लगावला. दरम्यान, सुनील तटकरे यांनी शरद पवार यांची घेतलेल्या भेटीबाबतही त्यांनी ही महाराष्ट्राची संस्कृती असून त्यांनी ज्येष्ठ नेत्यांची विचारपूस करणे. त्यात राजकारण शोधण्याचे कारण नाही, असे ते म्हणाले.
रॅपिडो आणि ओला सारख्या बाईक टॅक्सी सेवांवर कठोर कारवाईचा इशाराही सरनाईक यांनी दिला. बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाणार आहे. अनेक तक्रारी आल्यानंतर नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. संबंधित ॲप्स बंद करण्याची मागणी शासनाकडे करण्यात येणार असून नियमभंग करणाऱ्या बाईक्स ब्लॅकलिस्ट करण्याचाही निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.