उल्हासनगर महापालिका स्थायी समिती सभापती पदी शिंदेसेनेचे कलवंत सिंग सहातो यांची बिनविरोध निवड
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 19:47 IST2026-04-20T19:44:58+5:302026-04-20T19:47:42+5:30
उल्हासनगर महापालिका निवडणुकीत एकमेकांविरुद्ध उभे ठाकल्यानंतर सत्तेसाठी एकत्र आलेल्या भाजप आणि शिंदेसेनेने विविध पदांचे वाटप सामंजस्याने केले आहे.

उल्हासनगर महापालिका स्थायी समिती सभापती पदी शिंदेसेनेचे कलवंत सिंग सहातो यांची बिनविरोध निवड
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेच्या राजकारणात अखेर सत्तेची समीकरणे स्पष्ट झाली असून अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्थायी समिती सभापती पदी शिंदेसेनेचे कलवंत सिंग सहातो यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी सोमवारी झालेल्या महासभेत स्थायी समिती सभापती पदासह अन्य सभापती पदाची अधिकृत घोषणा केली.
उल्हासनगर महापालिका निवडणुकीत एकमेकांविरुद्ध उभे ठाकल्यानंतर सत्तेसाठी एकत्र आलेल्या भाजप आणि शिंदेसेनेने विविध पदांचे वाटप सामंजस्याने केले आहे. सध्या महापालिकेत महापौरपद शिंदेसेनेच्या अश्विनी निकम यांच्याकडे, तर उपमहापौरपद भाजपकडे आहे. याच धर्तीवर स्थायी समितीसह अन्य ९ विशेष समित्यांचेही वाटप पूर्ण झाले आहे. बुधवारी १५ एप्रिल रोजी सर्व १० समिती सभापती पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार हे आधीच निश्चित झाले होते. सोमवारी २० एप्रिल रोजी झालेल्या महासभेत पीठासीन अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी सर्व अधिकृत सभापती घोषणा झाली आहे.
महापालिका स्थायी समिती सभापती पदी कलवंत सिंग सहातो यांची बिनविरुद्ध निवड झाली. तर विशेष समिती पैकी शिंदेसेनेकडे पाणी पुरवठा समिती दीपा पंजाबी, महसूल समिती सभापती पदी प्रेरणा माखीजानी, आरोग्य समिती समिती सभापती पदी सविता तोरणे-रगडे, शिक्षण समिती सभापती पदी साक्षी सुर्वे, साई पक्षाच्या दीप्ती दुधानी यांना सार्वजनिक बांधकाम विभाग सभापती पदी तर भाजपचे विपुल मयेकर यांची गलिच्छ वस्ती निर्मूलन समिती सभापती पदी, नियोजन व विकास समितीच्या सभापती पदी मीना कौर लबाना, क्रीडा समाजकल्याण व सांस्कृतिक समिती सभापती पदी प्रीती माखीजा, महिला व बालकल्याण समिती सभापती पदी मीना सोंडे यांची बिनविरोध निवड केली.
पदांचे वाटप
एकूण ९ विशेष समित्यां पैकी ४ समित्या भाजपकडे तर ५ समित्या शिंदेसेना व मित्र पक्षांकडे गेल्या आहेत. सर्व पदांसाठी एकच अर्ज आल्याने कोणत्याही प्रकारचा संघर्ष न होता ही निवड प्रक्रिया अत्यंत शांततेत पार पडली. यामुळे आता महापालिकेच्या प्रशासकीय कामाला गती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.