उद्घाटन करण्याआधीच रायता पुलावर मृत्यूचे तांडव, एकाच मार्गिकेवरून दोन्ही बाजुची वाहतूक सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 11:08 IST2026-04-14T11:07:26+5:302026-04-14T11:08:15+5:30
Kalyan News: कल्याण-मुरबाड महामार्गावर उल्हास नदीवर नव्याने बांधण्यात येणाऱ्या रायता पुलाच्या दुसऱ्या मार्गिकेचे काम अपूर्ण असताना वाहतुकीसाठी एक मार्गिका खुली करण्यात आली आहे.

उद्घाटन करण्याआधीच रायता पुलावर मृत्यूचे तांडव, एकाच मार्गिकेवरून दोन्ही बाजुची वाहतूक सुरू
- राजेश जाधव
म्हारळ (कल्याण) - कल्याण-मुरबाड महामार्गावर उल्हास नदीवर नव्याने बांधण्यात येणाऱ्या रायता पुलाच्या दुसऱ्या मार्गिकेचे काम अपूर्ण असताना वाहतुकीसाठी एक मार्गिका खुली करण्यात आली आहे. एकाच मार्गिकेवरून दोन्ही बाजूची वाहतूक सुरू असल्याने प्रवासी टॅक्सी आणि सिमेंट काँक्रीट मिक्सरचा ट्रक समोरासमोर आले. टॅक्सीचा वेग अधिक असल्याने टक्कर होऊन भीषण अपघात झाला. उद्घाटनाआधीच रायता पुलावर मृत्यूचे तांडव पाहायला मिळाले.
या अपघातानंतर मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी अवैध प्रवासी वाहतुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी प्रवासी टॅक्सींचा परवाना कधी तपासला का? या मार्गावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचे परवाने याआधी कधी तपासले होते? परवाने वेळच्या वेळी तपासले असते तर अपघात होऊन त्यात
निष्पाप जीव गेले नसते, असे त्यांनी सांगितले. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणाबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
गतिरोधकांची मागणी : गोवेली आणि रायता येथील शाळेसमोर गतिरोधक असावेत, अशी मागणी स्थानिक गावकरी राजाराम सुरोशी, केतन पवार, ज्ञानेश्वर चोरगे आणि संतोष चोरगे यांनी केली आहे. ही मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.
‘लोकमत’ने केले होते सतर्क
‘जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉट जीवघेणे; उपाययोजना केवळ कागदावरच?’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने ११ एप्रिलला वृत्त प्रसिद्ध केले होते.
त्यात राष्ट्रीय महामार्गावरील संभाव्य अपघात स्थळांबाबत प्रशासनाला सतर्क केले होते. ग्रामीण पोलिस अधीक्षकांनी काही सूचना केल्या होत्या. त्याबाबतही माहिती देण्यात आली होती.