महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर मीरा-भाईंदरमध्ये शिंदेसेनेत होणार फेरबदल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 06:06 IST2026-02-08T06:02:41+5:302026-02-08T06:06:13+5:30
२०१७ च्या निवडणुकीत २२ जागा जिंकलेली शिवसेना यंदा ३० पेक्षा जास्त जागा जिंकण्याच्या आशेवर होती. मात्र त्यांना केवळ ३ जागा जिंकता आल्या

महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर मीरा-भाईंदरमध्ये शिंदेसेनेत होणार फेरबदल
मीरा रोड - मीरा-भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीत पानिपत झालेल्या शिंदेसेनेत शहरातील सर्व पदांची फेररचना करण्याचा निर्णय संपर्क प्रमुख आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला आहे. त्यासाठी जिल्हा स्तरावर चौघांची एक समिती तर प्रभागनिहाय आढावा घेण्यासाठी प्रत्येकी ३ सदस्यांच्या ४ समित्या नेमल्या आहेत.
२०१७ च्या निवडणुकीत २२ जागा जिंकलेली शिवसेना यंदा ३० पेक्षा जास्त जागा जिंकण्याच्या आशेवर होती. मात्र त्यांना केवळ ३ जागा जिंकता आल्या. तर २८ पेक्षा जास्त जागा भाजपला दोन्ही सेनेतील मराठी मतांच्या विभागणीत जिंकता आल्या. शिंदेसेनेच्या काही जागा तर अवघ्या काही मतांनी पडल्या. मंत्री सरनाईक यांचा एकहाती तंबू कोसळल्यानंतर आता मीरा-भाईदर शिंदेसेनेत मोठे फेरबदल होणार अशी चिन्हे आहेत.
मंत्री सरनाईक यांनी शहरातील शिवसेना संघटन अधिक सक्षम, गतिमान व प्रभावी करण्याच्य दृष्टीने संपूर्ण पदांची फेररचना करण्याचा निर्णय घेण्याचे म्हटले आहे त्यानुसार जिल्हाप्रमुख राजू भोईर, जिल्ह महिला संघटक निशा नार्वेकर, १४५ मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघ प्रमुख विक्रम प्रताप सिंग आणि युवासेना, ठाण लोकसभा अध्यक्ष पवन घरत यांची जिल्हा समिती बनवली आहे.
प्रभागनिहाय ४ समित्या
प्रभागनिहाय ४ समित्या केल्या असून त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधायचा आहे. भाईंदर पूर्वेच्या प्रभाग २,३,४,५,१०,११ साठी १४६ ओवळा माजिवडा विधानसभा प्रमुख सचिन मांजरेकर आणि पूजा आमगावकरसह युवासेना ठाणे - पालघर निरीक्षक स्वराज पाटील यांना नेमले आहे.
पहिली प्राथमिक बैठक
प्रभाग १२,१३, १४, १८ साठी नवीन सिंह, सपना मौर व राजन पांडे यांना नेमले आहे. १४५ मतदार संघातील प्रभाग ९,१५,१६,१७,१९,२०,२१,२२ साठी माजी नगरसेविका डॉ. नयना वसानी, संतोष गोळे, सरिता शिंदे आणि अमन गावंड यांची तर प्रभाग १,६,७,८,२३,२४ साठी कुणाल पुरोहित, तेजस्वी गावंड व मंदार रकवी यांना नेमले आहे. समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून, नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी योग्य नावे संकलित करावीत असे पत्रात नमूद केले आहे. या ५ समित्यांच्या सदस्यांची पहिली प्राथमिक बैठक शुक्रवारी रात्री झाली.