पेढे वाटणाऱ्या, फटाके फोडणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा- खासदार प्रणिती शिंदे
By आप्पासाहेब पाटील | Updated: May 5, 2026 15:27 IST2026-05-05T15:26:45+5:302026-05-05T15:27:27+5:30
नसरापूर अत्याचार प्रकरणावरून भाष्य करताना आरोपीला फाशी देण्याची केली मागणी

पेढे वाटणाऱ्या, फटाके फोडणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा- खासदार प्रणिती शिंदे
आप्पासाहेब पाटील, सोलापूर: नसरापूर घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र शोक संतप्त असताना मुख्यमंत्री मात्र राजकारणातील विजयाचा उत्सव पेढे वाटून साजरा करत आहेत. संवेदना संपल्या आहेत का ? असा सवाल करीत खा. प्रणिती शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
"उभा महाराष्ट्र नसरापूरच्या मुलीच्या कुटुंबाच्या बाजूने उभा असताना यांना पश्चिम बंगालच्या आसुरी विजयाचा आनंद सुचतो. फटाके उडविले जातात. पेढे वाटले जातात. भाजप सरकारच्या काळात सर्वसामान्य लोकांना न्याय मिळत नाही. त्यामुळे सामान्य जनता आता रस्त्यावर उतरत आहे," असे प्रणिती शिंदे म्हणाल्या.
"महाराष्ट्रात गृहखातं अस्तित्वात आहे का? महिला अत्याचार वाढले तसे अवैध धंद्यातून खून, मारामाऱ्या, गुन्हेगारी वाढली आहे. दररोज अनेक गुन्हे घडत आहेत. कायदा सुव्यवस्था अस्तित्वात नाही. पंतप्रधान असोत किंवा मुख्यमंत्री आणि त्यांच्या कार्यकर्ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत केवळ निवडणूका आणि राजकारण यात व्यस्त आहेत. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती पूर्णपणे ढासळली असून महाराष्ट्रात गुन्हेगारांच्या मनातून पोलिसांचा धाक संपला आहे," असा आरोप त्यांनी केला.
"नरसापूरमध्ये एका निष्पाप चिमुकलीवर बलात्कार करून अत्यंत क्रूर पद्धतीने तिची हत्या करण्यात आली. ही घटना केवळ संतापजनक नाही, तर संपूर्ण समाजाला हादरवणारी आहे. त्या चिमुकलीचे फोटो पाहिल्यानंतर अंगावर शहारे येतात, मनात प्रखर चीड निर्माण होते. अशा वासनेने पिसाळलेल्या नराधमाला तात्काळ फाशीची शिक्षा झालीच पाहिजे," अशी मागणी त्यांनी केली.