Sangli News: ‘आता कसं वाटतंय..’ गाणं लावण्याच्या वादातून ट्रॅक्टर चालकास मारहाण, तिघाजणांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 15:30 IST2026-05-13T15:30:38+5:302026-05-13T15:30:56+5:30
आटपाडी : बेरगळवाडी (ता. आटपाडी) येथे गाणे लावण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून शेतकरी व ट्रॅक्टरचालकास काठीने मारहाण केल्याची घटना घडली ...

Sangli News: ‘आता कसं वाटतंय..’ गाणं लावण्याच्या वादातून ट्रॅक्टर चालकास मारहाण, तिघाजणांवर गुन्हा
आटपाडी : बेरगळवाडी (ता. आटपाडी) येथे गाणे लावण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून शेतकरी व ट्रॅक्टरचालकास काठीने मारहाण केल्याची घटना घडली असून, याप्रकरणी तिघांविरोधात आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
अधिक माहिती अशी, लक्ष्मण जगन्नाथ वाघमारे (४०, रा. बेरगळवाडी, वाघमोरे वस्ती) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार चैतन्य विलास पडळकर (रा. पडळकरवाडी) तसेच महेश पोपट वाघमोरे व सूरज पोपट वाघमोरे (दोघे रा. बेरगळवाडी, वाघमोरे वस्ती) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी वाघमारे हे शेती व्यवसायासह ट्रॅक्टर चालक म्हणून काम करतात. दि. ९ मे रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास चैतन्य पडळकर याने ट्रॅक्टरवर मोठ्या आवाजात ‘आता कसं वाटतंय व कितीबी येऊन दे, एकलाच काफी हाय’ अशा आशयाचे गाणे मुद्दाम लावल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
याबाबत वाघमारे यांनी जाब विचारल्याने आरोपीने त्याचा राग मनात धरल्याचा आरोप केला आहे. यानंतर दि. १० मे रोजी सकाळी सुमारे ११.४५ वाजता पडळकरवाडी येथील राजाराम पांडुरंग पडळकर यांच्या घरासमोर आरोपींनी वाघमारे यांना अडवून शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
त्यानंतर दहा मिनिटांत बेरगळवाडीतील फिर्यादीच्या घरासमोर पुन्हा तिघांनी मिळून काठीने मारहाण केली. या मारहाणीत वाघमारे यांना दुखापत झाल्याचे पोलिसांनी सांगितले. यावेळी आरोपींनी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत केला आहे. या प्रकरणी आटपाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.